श्री समर्थ मालिक – अनेक वेळेला अनेक प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते हे फार श्रेष्ठ नाते आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा या नात्याची ओळख होऊ शकते, पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही, त्यांना त्याची जाण नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा आणि पहा किती फरक पडतो? याचा सेवेकर्यांनी विचार करावा.
हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहणे म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे होय. त्या ठिकाणी नाते शोधले जात नाही (म्हणून हे उत्पन्न होत असते) तर येथे आपपर भाव शोधला जातो, येथे स्वत:चा स्वार्थ शोधला जातो, येथे मी कोणीतरी विशेष आहे अशी भावना निर्माण झालेली असते. त्यापासून मग अहंकार, हेवेदावे, अहंपणा, अहंभाव निर्माण होतो. ही भावना जोपर्यंत मरत नाही, म्हणजे गटबाजी, कुचेष्टा, टवाळी करणे, टोमणे मारणे अन् थोडीशी का होईना अधिकार वाणीने उच्च आवाजात बोलण्याची सवयही असते, ती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत मानव भिन्न झाला आहे असे म्हणता येईल कां? तर नाही.
म्हणून तत्त्व भिन्न कि प्रकृती भिन्न ही विचारणा केली होती. प्रकृती भिन्न आहे म्हणून हा गोंधळ होत आहे, वाढत आहे. मग सेवेकर्यांनी सत् तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे की प्रकृतीच्या गतीप्रमाणे, मायावी गतीने चालले पाहिजे? (तत्त्वाप्रमाणे). मग तत्वाप्रमाणे चालाल अशी अपेक्षा करावी का? (मान्य आहे.)©️
