श्री समर्थ मालिक – संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||
आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत आहे.
या ठिकाणी काही लोक आहे त्यातील थोड्या जणांनाच ही खूण सापडली आहे. निष्काम वृत्तीने सेवेकरी कर्तव्याला झटत आहेत. जखडून आहेत ते सेवेकरी मात्र पूर्ण शांत असतात. त्यांना कळून चुकलेले असते. जे माहित नाही ते माहित झाल्यानंतर त्यांना कशाचीही अपेक्षा नसते.
या ठिकाणी स्पष्ट निवेदन केले आहे. जे गुप्त आहे, ते दाखविले आहे. पूर्वीच्या कर्म संचिताप्रमाणे काही सेवेकरी अडीअडचणीत असतात. म्हणून अवधी असतो. तरी त्याने मन मोकळेपणाने कर्तव्याची वाटचाल करावी. शंका रहित कल्पना रहित होऊनच वाटचाल करावी. जे केल्याने सद्गुरुंची प्राप्ती होते, सद्गुरु चरणांची प्राप्ती होते. ©️
