श्री समर्थ मालिक – भक्त भगवंताचे ठाई अन् भगवंत भक्ताचे ठाई असतात. मी कुठे आहे? हे या यत्किंचित मानवांना काय कळणार? मी नाही आकाशी, मी नाही पाताळी. कोण माझा शोध घेणार आहे? जो भक्त आहे, तोच माझा तपास करू शकतो. अघोर कधीही माझा शोध घेऊ शकणार नाहीत.
बरेच दिवस आसनाधिस्तांचा अन् माझा वाद चालला आहे. मी चाल ढकल करीत होतो, पण आता मात्र डोक्यावर ओझे आहे. थोडे संयमन आहे. हे ओझे माझ्यावर जास्त झाले, तर ही धरा सुद्धा स्थिर राहणार नाही. हलणार आहे. मात्र शांत रहा. शांती हिच कामाला येते. ज्या सेवेकरीणीला त्रास दिला, तिच्या चरणांवर लोळायला लावीन. नाहीतर मी सत नव्हेच ! त्या सेवेकरीणीसाठी आसन, आसनाधिस्त जितके तळमळत आहेत, तितकाच मी देखील तळमळत आहे. अघोर मानवांना तोंड देऊन आसनाच्या कर्तव्यासाठी जागत आहे. ठीक आहे, माझ्याशी गाठ आहे.
स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळात माझे लक्ष असते. भक्ताच्या ठिकाणी लक्ष असते. मी निराकारी असतो तर कोणी पाहिले नसते. आकारातच माझा वास आहे हे सेवेकऱ्यांनो लक्षात ठेवा. नाही पेक्षा तुमच्यासारखे अभागी तुम्हीच ! पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे सानिध्यात घेतले आहे. आसनाधिस्त म्हणतात, मला या ठिकाणी का फेकले? कारण अघोर मानवांचे शुद्धीकरण करावयाचे होते. काही ज्योतींना सानिध्य द्यावयाचे होते म्हणून त्या ठिकाणी आसन टाकले आहे. थोड्या दिवसात आपणास सर्वस्व समजेल. (समाप्त)©️
