श्री समर्थ मालिक – वेद अनंत बोलीला | अर्थ इतकाच काढीला || निजनिष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलासी जावे ||
वेद म्हणजे काय? हा किती तऱ्हेने सुटतो? बोलाचा अंत सापडला आहे काय? बोल, प्रणव कोठून सुटतात?
चैतन्याची घुसळण झाल्याशिवाय वेदना नाही. वेदना झाल्यानंतर प्रणव सुटतात, ह्यालाच वेद म्हणा अगर काही म्हणा ! हे कोठून, कसे, कोणत्या तऱ्हेने सुटतात याचे विवेचन कोण करतो? हे कशासाठी होते? याचा आचार विचार ज्याने जाणला, त्यानेच जाणला. इतरांना याचे कोडकौतुक वाटत नाही. ज्याला वाटते, त्याने आपल्या हृदयात साठवावे. ज्याने हे जाणले, त्याने पूर्ण कवटाळून ठेवले. मग विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, स्वयंभू म्हणा, काही म्हणा असे मानवाचे आहे. पण जो सत् तत्त्वात गुंगला, त्याची कृती बघा अन अहंकाराने मायावीत गुरफटलेला मानव बघा. त्या दोघात किती अंतर पडते? बोलाचा किती फेरफार होतो?
वेदना निर्माण झाल्यानंतर प्रणव सुटतात, पण सत् आणि मायावी प्रणव यात बराच फरक असतो. बोल बोलवितो कोण? हे ज्याने ओळखले त्यानेच ओळखले. ज्याने ओळखले नाही तो म्हणतो, “मीच शहाणा आहे.” पण मी मायेला किती मारून, त्याच्याकडून भरपाई करून घेत असतो. ©️
