श्री समर्थ मालिक – हल्लीचा मानव कोठे भटकतो, त्याची मोजदाद नाही. जो अमृताहुनी गोड पदाला मिळाला, ज्याने रस चाखला, तो यात रममाण झाल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. ज्याला रममाण करावयाचे त्यालाच रममाण केले जाते. ज्याला याची गोडी नाही, त्याला कदापिही घेणार नाही. गोडी लागू देणार नाही. जे सानिध्यात आहेत, ज्यांना एक तत्व पटले त्यांनी कोणीही हे विसरू नये. जो विसरला त्याचा तो अभागी होय. म्हणून अशा तत्त्वाला राम म्हणा, गोविंद म्हणा, काहीही म्हणा, नाम हे अनंत रूपाने नटले आहे.
मी अनंत रूपाने नटून पृथ्वीची उलथा पालथ करीत असतो. जडत्व नटविल्याशिवाय मला आत स्थान घेता येत नाही. जडत्व वेगळे आहे. मी मात्र वेगळा आहे. जडत्व कशासाठी नटविले आहे? मायेचे चंचलत्व पाहण्यासाठी अनेक तऱ्हेचे कर्तव्य करण्यासाठी ही धारणा करावी लागते. प्रकृती नटवावी लागते. अशा प्रमाणे सत् सानिध्य मिळत मिळत मानव जन्म देऊन सत कर्तव्याची फेड केली जाते, पण मानवांना याची गती नसते. म्हणून या ठिकाणी मानव आहेत, त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण प्रगट रूपाने केले आहे. घेईल तो भला, नाही घेईल तो पण भला ! (समाप्त) ©️
