दिनांक:- १ जुलै १९७६
जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव । तेणे आत्मस्थिती जाणीतसे।
श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतू रहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच मानव अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो, अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.
मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकेल का?तर शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो? अहंकाररहीत झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल. अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परीने सद्गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काहीही अवघड नाही.
मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वरांनी, अनंतांनी मानवाला शक्ती दिलेली आहे. ही शक्ती सर्वस्व भरून उरलेली आहे. ते नाहीत असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरु चरणात, सत चरणात लय असेल, तर सद्गुरु त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवितात. सद्गुरूंच्या ठिकाणी ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल, तर त्याचा काय उपयोग आहे? ©️
