श्री समर्थ मालिक – भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.
सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी? तर त्याच महान तत्वाने नटविली आहे.
अनंत रूपामध्ये ही प्रकृती वावरते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ! म्हणून प्रकृती ही अनंत स्वरूपाने नटलेली आहे. तशीच मते सुद्धा भिन्न आहेत.
पूर्वजन्मीचे सानिध्य आहे, त्यामुळे त्याला जरी सद्गुरु दर्शन नसले, तरी मनाला सत् बनविण्याचा प्रयत्न केला तर ते स्थिर होते.
मन हे कोणापासून आहे? प्रकृतीची अंगे वेगवेगळी दाखविलेली आहेत. पण प्रकृतीच्या आतमध्ये एकच तत्व आहे. मग ते एकच तत्व भिन्न प्रकृतीच्या अनुसंधनाने अनुग्रह देण्याचा प्रयत्न करते. ते ही, त्या तऱ्हेची प्रकृती असेल तर उपरती येते. अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन् गुरु वेगळ्या प्रकारचे असे म्हणता येईल का? ©️
