श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार नाही, पाहता येणार नाही. खरोखरच येथील सर्व सेवेकर्यांनी आपल्या सद्गुरुंकरीता मनामध्ये सदभावना, सतशुद्धपणा आणणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. सेवेकर्याच्या मनाची भावना सतशुद्ध असेल तर त्याचे क्रियाकर्म सत शुद्ध असेल. परंतु आपले सेवेकरी कसे आहेत? “वाटता जड भारी, मग आठवावा श्रीहरी.” सद्गुरूंनी कर्तव्याकरता प्रणव दिले तर त्यांच्याजवळ कर्तव्य करण्यासाठी वेळ नसतो, परंतु सद्गुरूंनी जर असे सांगितले की ”आता मला वेळ नाही नंतर पाहू”, तर सेवेकऱ्यांची अवस्था काय होईल? परंतु सद्गुरु तत्त्व दयाघन आहे, त्यांना आपल्या सेवेकऱ्यांकरीता माया आहे, ओढ आहे, आपुलकी आहे, ते त्याला प्रसंगातून मुक्त करतात. ते सदैव सेवेकऱ्यांना सांगत असतात, मनात सदभावना निर्माण कर. मन सद्गुरुमय बनविण्याचा प्रयत्न कर आणि एकदा मनाने ते आकारले की त्यांची भावना सदैव सतच राहणार! पण जर एखाद्या सेवेकऱ्याने स्वतःला यापासून वंचित केले, गैरकृत्ये केली, तर विचार करा तुम्हाला परत सद्गुरु सानिध्य कसे मिळेल?
मनाला आकार देणे ही त्या सताची शक्ती आहे. तुम्हाला परत सानिध्यात पाठविणे ही देखील त्या अनंतांची,सताची, सद्गुरूंची शक्ती आहे. म्हणून सेवेकऱ्यांनो आपल्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सदभावना जागृत ठेवा. मनाला परोपरीने सांगा की आपले सर्वस्व त्या अचलाप्रत ठेव, तरच तुला पुढची गती प्राप्त होईल आणि एकदा गती मिळून सर्वस्व तुझ्यातच प्रगटले मग तुला कशाचीही ददात नाही. हे मना! तू त्यांची, सद्गुरूंची जाण घे, पूर्ण सतमय हो, सद्गुरुमय हो. माझ्या सद्गुरू शिवाय या त्रिभुनात वेगळे तत्त्व नाही.
पण हे मन स्थिर करणे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. एकच तत्व त्याला स्थिर करू शकते ते म्हणजेच सत किंवा सद्गुरु तत्त्व! पण हे कधी होईल ज्यावेळी सेवेकरी शारीरिक, मानसिक, संपूर्णपणे सताकरिता, सद्गुरुंकरीता ओथंबलेला असेल तेव्हाच ते होऊ शकेल. त्यावेळी त्याचे मन स्थिर होईल….©️
