श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मनाचे मी तू रहीत होणे याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकेल का? आणि कोणी असे म्हटले आहे की मी आता मी-तू रहीत झालेलो आहे. तेव्हा कसे आणि कधी ते मनाला टिचकी मारतील ते कळणार नाही. हे कळण्याची, समजण्याची, जाणण्याची सेवेकर्यांनो तुमची कुवत नाही. कारण त्या अनंत शक्तीचा ठाव घेणे अत्यंत दुरापास्त आहे. करून अकर्ते पद आहे ते! त्या शक्तीचा मुकाबला त्रिभुवनात कोणीही करू शकणार नाही.
संतांनी हे सर्वस्व जाणले होते म्हणून ते म्हणत असत, ”अनंता मी तुमच्या चरणाचा दास आहे, माझे सर्वस्व आपणच आहात. मी माझा नाही आणि असे मन ज्यावेळी जिवात्म्याकडे व्यवहार करील त्यावेळी शिवात्मा प्रगट होईल”. हेतू रहीत झाल्याशिवाय जीवात्मा सापडणे शक्य नाही. प्रथम जीवात्मा शोधण्यासाठी, त्याच्या प्रत जाण्यासाठी हेतू रहीत होणे आवश्यक आहे.
सेवेकऱ्यांनी परोपकार जरूर करावा, परंतु सर्वप्रथम स्वतःची मानसिक शक्ती अजमावून परोपकार करा. जीवात्मा हा प्रत्येक अणू रेणूत भरलेला आहे. मानवाने दानशूर होण्यापेक्षा स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. ही जीव शक्ती अनंतांनी, सतानी प्रत्येक प्राणीमात्रात फेकलेली आहे. मन हीच या शक्तीची मेख आहे. ते सत सांगते, अनंत सांगतात, सद्गुरु सांगतात की तुझे मनच तू माझ्या ठिकाणी लय कर. कृष्णांनी देखील पार्थाला हेच सांगितले की हे पार्था, तू तुझे मन माझ्यातच लय कर. परंतु सेवेकरी काय करतात तर,”वाटता जड भारी, मगच आठवावा श्रीहरी.” ते म्हणतात “काही प्रसंग आला तरच सद्गुरूंची आठवण करूया नाहीतर त्यांना उगाच कशाला त्रास द्या.”©️
