सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रणवांप्रमाणे आपण मार्गस्थ झालात तर सद्गुरूंना देखील मनोमन समाधान वाटते, पण जर हेच त्या अमृततुल्य बोलांकडे दुर्लक्ष केले तर सद्गुरूंना काय वाटेल? आणि जर सेवेकऱ्यांना कोणताही त्रास होऊ लागला, त्यांच्यावर कोणता प्रसंग ओढावला, मग सेवेकरी गयावया कोठे करणार? सद्गुरूंकडेच करणार नाही का? मग सद्गुरूंनी काय करावे? म्हणून सांगतो….
मी तू रहीत होण्याचा प्रयत्न करा, कारण ही अत्यंत कठीण दुरापास्त गोष्ट आहे.
मी तू रहीत होणे म्हणजे सतमय होणे. जे काही आपले सद्गुरु सांगतील ते ब्रह्म वाक्य! दुसरे मी काही जाणत नाही. अशी सेवेकऱ्यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविश्वास प्रत्येक सेवेकर्याजवळ असावयास पाहिजे. सद्गुरूंचे वाक्य जर सेवेकऱ्याने प्रमाण मानले नाही तर कोणाचे वाक्य प्रमाण मानावे? मी तू रहीत होणे म्हणजेच अद्वैत होणे होय ! हे होण्यासाठी सेवेकर्यांनी मनाने सतमय होणे आवश्यक आहे. मन एकदा सतमय झाले की सर्वस्व सतमय झालेच म्हणून समजा. म्हणून सद्गुरूंच्या ठायी, सत चरणावर मन अर्पण करताना कसे असले पाहिजे तर ठाम ! सेवेकऱ्यांच्या मनात ही भावना सदैव असली पाहिजे, मी सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू माझे आहेत. ©️
