श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेकऱ्याची आहे. एखादा सेवेकरी विचित्र तऱ्हेने जाऊ लागला, वागू लागला तर मात्र सद्गुरु त्यावर नाराज होतात. पण सेवेकऱ्यासाठी सद्गुरु सदैव खालीवर होतात. त्यांच्या मनात सेवेकऱ्याबद्दल तळमळ असते.
भक्त आणि भगवंत वेगळे आहेत का, हे समजण्यावर आहे. सेवेकरी कसा पाहिजे तर सत शुद्ध आणि ठाम! माझे सद्गुरू सांगतील तेच प्रमाण त्या वेगळे दुसरे काही नाही अशी त्याच्या मनाची ठाम धारणा असली पाहिजे. सेवेकर्यावर एकदा प्रसंग आला, आपत्ती आली तर सद्गुरु असे म्हणतात का, ”मला तुझ्या संसाराशी काय घेणे देणे आहे? तुझे तूच बघ.” वेळ प्रसंगी सद्गुरू धाव घेत नाहीत असे कधी झाले आहे का? सर्वात प्रथम सेवेकऱ्यासाठी धाव घेणारे सद्गुरु असतात. भक्तांसाठी भगवंतच धाव घेतात. माया नाही. आप्तस्वकीय जबाबदारी पडल्यावर दूर जातात, दूर लोटतात. परंतु कितीही जबाबदारी पडली तरी सद्गुरु मात्र सेवेकऱ्याला दूर लोटत नाहीत. मग अशा सद्गुरूंच्या ठिकाणी का ठाम राहू नये? का अद्वैत राहू नये? सेवेकऱ्याला प्रसंगातून सोडविण्यासाठी जीवाचे रान करतात, संतांनीच सांगितले आहे की तू अद्वैत हो, सर्वस्व सद्गुरू चरणांवर अर्पण कर. हे केल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की आत्मज्ञान तुझ्यापासून दूर नाही. परंतु तसे होत नाही. याला कारण माया!
ज्यांना आपण माझे म्हणतो, ते कोणीही तुला आत्मज्ञान दाखवू शकणार नाहीत. मानवाने, सेवेकर्यांनी परोपकार जरूर करावेत पण कसे तर चंदनासारखे! चंदन स्वतः झिजते आणि झिजताना दुसऱ्याला सुगंध देते. परंतु या मायावी स्थितीत कितीही जरी झिजलो तरी सुगंध स्थिती येते का हो? ©️
