श्री समर्थ मालिक – सेवेकरी कसाही असो, सद्गुरु जितके कठीण, तितकेच ते लोण्यापेक्षाही मऊ आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे सेवेकरी वाटचाल करू लागला तर ते कधीही कठीण होणार नाहीत. सेवेकऱ्यांचे, सर्वस्वांचे निधान या ठिकाणी आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सावधगिरीने वागावे. तुम्ही नामात दंग राहिलात, मग कुठेही जा, ते तुमच्या पाठीशी आहेत.
सद्गुरुंचा आदेश, प्रणव तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग घुमत असतो.
अघोरांनी किती जरी थैमान घातले, तरी अंती विजय सताचाच आहे. आता जे चालले आहे, ते असेच आहे.
काही सेवेकर्यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते. म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. तो जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात. थोडासा त्रास सहन केला पाहिजे. म्हणून त्या संतांनी असे म्हटले आहे.
पूर्वीच्या संताप्रमाणे कृती करा अन् चौकटीत बसा. राम अवतारात, कृष्ण अवतारात कर्तव्य झाले. सद्गुरु आदेश, संदेश पाळा. जोपर्यंत स्थूलांगी सद्गुरु येथे आहेत तोपर्यंत साधा, साधून घ्या. याची खूणगाठ बांधा. एकदा का फिरतीवर गेले की तुम्ही या म्हटले तरी येणार नाहीत. उद्या ते फिरतीवर गेल्यावर मग दरबारच दरबार ! कित्येक वेळेला संदेश दिले की, अघोरां बरोबर सतालाही त्रास होईल, म्हणून अघोरी अघोराने खेळ खेळते. सत् सताने खेळ खेळते. (समाप्त) ©️
