श्री समर्थ मालिक – सेवेकरी मी रहित, मनाचे जोगे सिद्धी पावे असे होतील कां? पण सेवेकरी होत नाहीत. त्याला मी काय करावे? बघा. प्रयत्न करा. आसनाधिस्त काय सांगतात ते ऐका. विचारवंत व्हा अन् काही तरी करा एवढे संदेश देत आहे. शांतता आणि समता या ठिकाणी ठेवलीच पाहिजे. आता येथून पुढे सेवेकर्यांनी विचार करण्याचा प्रयत्न करावा.
सद्गुरु माऊली म्हणते, “सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे देखील आपण ! हे जरी खरे आहे, तरी वाईट एकाच गोष्टीचे आहे की सेवेकर्यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती.
सेवेकर्यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना सुद्धा ही सत् संपत्ती त्यांनी का लुटू नये? भंडार का लुटू नये? या सत् संपत्तीची गोडी सेवेकर्यांना का असू नये? जर आहे मग लुटण्याची मनाई कोणी केली आहे का? मग सर्वस्वांना मायावीची गोडी कां?
“पण” रहित सेवेकरी झाला की त्या खजिन्याला त्याने हात घातलाच म्हणून समजा. थोडीशी मनाला शंका आली की, मायेचा पगडा बसलाच ! शंका का येते तर मन चंचल होते. महामायेला थोडी संधी मिळाली की सेवेकरी गयावया करतो. कारण नटलेले जे आहे ते मायावीने नटलेले आहे अन् म्हणून माया कोणालाही माझ्यापर्यंत येऊ देत नाही. ज्याने तत्वाची ओळख करून घेतली, जे ठाम राहिले तेच या ठिकाणी येऊ शकतात. ही बया आहे. ती म्हणते मीच सर्वस्व ! तिला अधिकार दिलेले आहेत म्हणून सेवेकरी फसतो. ©️
