सेवेकऱ्यांची भावना श्रेष्ठ आहे. कर्तव्यात जागृत आहेत. मान्य आहे. आपली प्रवचन ऐकण्याची उत्कृष्ट इच्छा आहे हे मी जाणतो.
मनाची भावना अद्वैत कशी होईल? सद्गुरु आणि सेवेकरी वेगळे नाहीत हे केव्हा समजेल? सद्गुरु दर्शन कधी होईल? याची विवंचना केल्यानंतर कसलेही संकट येणार नाही. परंतु, सेवेकरी मायावी जाळ्यात गुरफटल्यानंतर काहीही करता येत नाही.
मायावी जाळे म्हणजे त्याच्या पाठीमागे हा संसार लागला आहे आणि संसार न करावा, तर सेवेकऱ्याने काय करावे? काही सेवेकरी असे म्हणत आहेत की, मला निष्कारण संसारात टाकले आहे. सेवेकरी संसारात आहेत, मग सद्गुरु संसारमय नाहीत का? इतकेच, सद्गुरु कोणाला ओळख देतात, तर कोणाला देत नाहीत.
ज्याने चरणांवर सर्वस्व वाहिले आहे, त्याला काही कमी नाही. तो द्वैत दृष्टीने पाहत नाही. द्वैत अद्वैत एक झाले म्हणजे सर्व ठिकाणी एकच आहे हे कळून येईल. त्याला दुसरे काही दिसणार नाही, असे ते सत आहे.
प्रकृती भिन्न आहे, म्हणूनच मानव मी-तू, माझे-तुझे करतो. परंतु प्रकृतीच्या अंत:र्यामी आहे, तो मीच आहे. मला रूप, रंग, आकार, विकार काहीही नाही. असे ते सत् तत्व आहे. अशांना जर द्वैत वाटत नाही, तर सेवेकऱ्यांना का द्वैत वाटावे?
सर्व ठिकाणी एकच स्वयं तत्व आहे, हे पाहण्याकरीता मन मिलन होण्याची आवश्यकता आहे. मुक्ती म्हणजे, मी कोणीही नाही, माझे यात काहीही नाही, माझ्याकडून ते सतच कर्तव्य करून घेत आहेत, मी निमित्त मात्र आहे. माझे कर्तव्य मी करतो, पण तेच करून घेतात. चुकीबद्दल क्षमा मागतो. याप्रमाणे मी सद्गुरु ठिकाणी लीन कसा होईल याची विवंचना असल्यानंतर मग मी दुःखी राहीन का? (समाप्त) ©️
