या दरबार मध्ये पूर्व संचिताप्रमाणे ज्योती घ्यावयाच्या त्याच घेतल्या जाणार ! इतरांना हा लाभ मिळणे दुरापास्त आहे. गीतेत विवेचन केले आहे, स्वयंभूने देखील सांगितले आहे. भक्तीला उपाधी, घट, मठ काहीही नको. हा राजमार्ग आहे. या मार्गाने सेवेकरी गेला, तरच त्या ठिकाणी तो जाईल. त्याला आडपडदे, दगड धोंडे, काटे कुटे काहीही नाहीत. अशा राज मार्गाने जो सेवेकरी जातो, त्याचा कस घ्यावा लागतो.
कस घेणे हा समर्थांचा हक्क आहे की नाही? मग या कसाला सेवेकऱ्याने का उतरू नये? त्याचे मन दहाही दिशा फिरते. पण सेवेकरी नि:संग झाल्यानंतर समर्थ कस घेतील का? पण नि:संग होणे अवघड आहे. पण हल्लीचा काळ असा आहे का? का पूर्वापार असे चालले आहे? ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, कबीर त्याचप्रमाणे वशिष्ठ मुनीं सारख्यानी, त्याचप्रमाणे मीरा, नामदेव, गोरा कुंभार यांनी सुद्धा कंठशोष केला, पण मानवांना पटले का? तर आत्ताच हे कसे पटणार? पण ज्याला पटवायचे, तो पटवून घेतो. काहीना पटत नाही.
ज्याला गोडी वाटते त्यालाच हे सांगण्याचा प्रयत्न करावा. ज्याला पटत नाही, त्याला अमृत पाजण्याची काय आवश्यकता? ज्याला विष प्राशन करण्याची गोडी आहे, त्याला अमृत प्राशन करण्याची गोडी का निर्माण करावी? अशांपासून दूर राहणेच इष्ट आहे. त्याला सांगणे तुझीच भक्ती श्रेष्ठ आहे. आमच्या सारख्या वेड्याच्या नादी लागू नको. पण वाद नको. (पुढे सुरु….३) ©️
