श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामाणसात रहा आणि जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा अन मला डोळे भरून पहा. हे दोघांचे एकदा समीकरण केले की पाचवा प्रणव प्रगट होईल. एकदा का पाचवा प्रणव प्रगटला की सर्वस्वाचा शोध घेऊ शकता. सर्वस्वाचा अंत सत भक्तीने लावला जावू शकतो.
भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राजामार्गामध्ये काय पाहिजे तर लिनत्व ! गुरुदेव कसे आहेत तर अत्यंत लीन अन अफाट शक्ती! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे! भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन अभक्ति भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामावर आपण स्मरण करत असतो त्याला नामस्मरण म्हणतात, त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्ती पुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य त्रिभुवनात कोणाकडेही नाही. या नावाचा नाश हे तपस्वी करू शकणार नाहीत. हे नामदेखील तपसव्यांकडे होते, नामरहीत ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहीत तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त! ऋषीमुनी, गुरुदेव, सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहीत, तर इतरांची भक्ती अहंकार युक्त! अहंकारात षडरिपू रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.भक्ती मध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित शक्ती आहे. ©️
