श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू सांगतात हा अभ्यास तुझा तूलाच करावयाचा आहे, परंतु तुमच्या मनात सद्गुरूंबद्दल सद्भावना ओथंबल्याशिवाय बाबा तरी काय करतील? म्हणून कर्तव्य करताना देखील सत तुम्हाला याचा अभ्यास घडवित असते. अव्यक्ताकडून कर्तव्य घडते, ते कसे होते याचा अभ्यास तुम्हाला घडवतात. अव्यक्तांचे प्रणव तुम्ही ऐकता हे देखील तुमचे भाग्यच आहे. जरी तुम्ही ते पाहू शकला नाहीत तरी त्यांचे प्रणव तुम्हाला ऐकावयास मिळतात हे देखील तुमचे भाग्यच आहे. अनंतांचे प्रणव ऐकणे याहून महत भाग्य ते कोणते? असे प्रणव इतरत्र कोठे ऐकायला मिळतील? कोणाला अनुभवता येतील?
गुरुदेव पितामहांसारखे परमपूज्य तत्व, सप्तऋषींचे प्रमुख, यज्ञयागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्या पुढे लीन आहेत असे ते तत्व, ते देखील या आसनाप्रत प्रणव देतात, मग असे ते आसन आणि त्यावर आरुढ असलेले तत्व सेवेकऱ्यांनो परमश्रेष्ठ नाही का? मग अशा आसनाप्रत, अशा तत्त्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे? आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सतमय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरूच आहेत. याच्या वेगळे जाण देणारे दुसरे कोणीही नाही…©️
