श्री समर्थ मालिक – प्रथम चैतन्य आकार बिंदू, त्यापासून धुनधुनकार ! धुंधुंकारापासून ओंकार, नंतर हा जगताचा पसारा झाला. ओंकाराची निर्मिती झाल्याशिवाय जगाची निर्मिती नाही. धुंधुंकारापासून ओंकार अन ओंकाराचे पोटी महामाया. महामायेपासून त्रिगुण निर्माण झाले. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली. मग ओंकार हे तत्व नसते, तर तुम्ही कोणाला पाहिले असते, म्हणूनच तिला महामाया म्हटलेले आहे. मग तुम्ही सतमाया म्हणा, अगर काहीही म्हणा !
ओंकार हे बीजच नसते तर काही पाहता आले नसते. म्हणूनच ही जी मांं आहे, हे सतच आहे. तुमचे सद्गुरु बाबा आहेत, ते ओंकार स्वरूपीच आहेत, अन ओंकार हीच महामाया आहे. ही माया सर्व ठिकाणी विखुरली आहे. ते एकच तत्व आहे. ते तत्त्व नसते, तर आकार निर्माण झाला असता का? ते अनेक तऱ्हेने वावरू शकतात.
जगाच्या उत्पत्तीसाठी आकार निर्माण करावा लागला. ओंकार निर्मिती नसती, तर जगाचा पसारा झाला नसता. सर्व भूतेषु पश्य: ते आहे. तो चैतन्य बिंदू त्याला सुद्धा मायेची आवश्यकता आहे. सेवेकऱ्यांना शंका येईल की, २० वर्षात याचवेळी मायेवर प्रवचन झाले. पण शंकेचे निरसन विचारांती होते. म्हणून ओंकार तिलाच ओम बा म्हटलेले आहे. म्हणून ही दोन्ही तत्त्वे सारखीच आहेत. एकमेकांवर एकमेक अवलंबून आहेत. बिंदू आकाराला धरून आहे. आकार बिंदूला धरून आहे. मग त्यांना माता का म्हणू नये? माता म्हणण्याची आवश्यकता आहे ना? म्हणून ते तत्व श्रेष्ठ आहे. तिच्याच आधाराने महान तत्वाची ओळख होते.
इतकेच, कर्ता करविता एकच आहे. एकापासूनच अनेक निर्माण झाले. त्यांना ते करावे लागले. यातच आपण समजले पाहिजे म्हणून मातेची सेवा, प्रेम पवित्र अन श्रेष्ठ आहे. मानवी तऱ्हेने जगात पुष्कळ माता आहेत, पण त्यात अन यात पुष्कळ अंतर आहे.©️
