श्री समर्थ मालिक – या ठिकाणी आसनाचे सानिध्यात काय चालते, हे सेवेकऱ्यांना माहित आहे. त्याचा त्यांना अनुभव आहे. या मार्गात तो गुंतला, या मार्गाने तो जाऊ लागला कि तेव्हाच ही गती माहीत होते.
सेवेकरी म्हणा, भक्त म्हणा याचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशा तऱ्हेची गती असू नये. इतकेच काय, त्यांना एवढे सुद्धा भान राहत नाही कि मी हे कोणाच्या कृपेने करीत आहे? त्याच्या मनाची समजूत होते कि मी कोणीतरी विशेष आहे. ह्या गोष्टीचे जर भान त्याला असेल तर त्याच्याकडून बोलघेवडेपणा कमी होईल.
दुसरी गोष्ट, सेवेकरी ठाम आहेत इतकेच खरे आहे. जे होणार आहे, ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ती घडल्याशिवाय राहणार नाही. या भारत भूमीबद्दल मागेच बोल दिलेले आहेत. पण भारतामध्ये अघोर, आपमतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही म्हणून या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून हे असे होत आहे. ते पूर्ण झालेले नाही म्हणून हात घालता येत नाही. शिशुपाळाचे १०१ अपराध घडले, पण आताच्या काळात १०१ व्हायला नकोत. पूर्ण शंभर तरी झाले पाहिजेत, मग विलंब लागणार नाही. आता काळ नजीक आलेला आहे. पुढे काय होणार हे मी सांगत नाही अन् सांगणारही नाही. आपण पाहत राहणे. कृष्णाने कंसाशी तसेच इतर अघोर मानवांची जसी घुसळण केली त्याच तऱ्हेची गती आता होणार आहे. नैसर्गिक गतीकडून ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मानवी कृती कडूनही घुसळण होणार आहे. आपल्या दृष्टीसमोर सर्वस्व खेळ असेलच. ©️
