श्री संत ज्ञानेश्वर – कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. नासते म्हणावे तर परत जन्माला कसे येते? हे करतो कोण? एकच सत् ! गुरुमाऊली !! ज्यांना कर्तव्य करून घ्यावयाचे असते, तेच उत्पत्ती स्थिती अन् लय करीत असतात. दुसरे कोणीही नाही. बहुत जन्मांचे सुकृत, त्यांची भरपाई झाल्यानंतर ते आपल्या सानिध्यात घेतात. असे ते मालिक आहेत.
सतपुरुषांना, योग्यांना हे जे आहे, ते सर्व अमरच आहेत असेच म्हटले पाहिजे. वृद्धत्व आल्यानंतर, शरीर जीर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर जडत्वाला ताबडतोब उचलतात. कारण घाण लागेल म्हणून ! म्हणून हा सर्व दृश्य अदृश्याचा खेळ आहे. दुसरे काहीही नाही.
दिव्यदृष्टीने पाहिल्यास कोणाचाही नाश होत नाही. अंगावरील वसन फाटल्यानंतर जसे आपण फेकून देतो, तद्वतच हे सारे आहे. यातच ओळखावे. जे दिसत नाही तेच सेवेकर्यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा. ते सद्गुरू शिवाय कोणीही दाखविणार नाही. तेच पांडुरंग ! तेच सर्वस्व !! अनंत रूपाने, अनंत नामाने ते नटलेले आहेत. म्हणून कोणत्या रूपाने त्यांना पहावे? हाक मारावी? ज्या नावाने हाक मारावयाची, ते नाम सेवेकऱ्यांना माहित आहे. ©️
