श्री समर्थ मालिक – सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये सत किती आणि असत किती प्रमाणात आहे हे आपणास पूर्ण माहित आहे अन् याचा उहापोह मागे केलेला आहे. आजच्या परिस्थितीत सतावर पुष्कळ दडपण आहे म्हणून पुष्कळ त्रास होतो, तरी सुद्धा कर्तव्य होत आहे. आता थोडे दिवस बाकी राहिले आहेत. मग आपणास कळेल कुणाची बाजू सरस आहे ते. सत् भक्तासाठी कष्ट सोसणे हे सताचे कर्तव्य आहे. सताला दुःखाच्या डोंगरातून, काट्याकुट्यातून पार पडायचे असते. अन् ते सत् काट्याकुट्यातून, बिकट मार्गातून पार पडून जातेच जाते. हा आताचाच अनुभव नाही. आदिअंतापासून हेच चाललेले आहे. जो सत् भक्तीत शिरला तो कष्टातच शिरला. त्याच्या खांद्यावर कष्टाचीच झालर असते. ते कष्ट भोगत भोगतच अखेर सत अघोराचा नि:पात करते. तरी सुद्धा सर्वस्व अघोर खतम करतील हे मी समजू शकत नाही. इतकेच काही दिवसानंतर हे सत् जास्त प्रमाणात होईल.
किती वर्षे हे घर्षण चाललेले आहे. तरीही हे अजून चालूच आहे. जास्तीत जास्त हे शुद्धीकरण सहा महिने चालेल. त्यानंतर शांत वातावरण निर्माण होईल. या ठिकाणी काही सेवेकरी सद्भक्तीसाठी तहानलेले आहेत. ते येण्याचे मार्गी लागतील. तदनंतर कर्तव्य सुलभ होईल. थोडे दिवस त्रास होईल. कोकणातील सेवेकरी माझी उपासना करतात. त्यांच्यावर माझे लक्ष आहे. मानसिक त्रास आहे हे मला मान्य आहे. पण हे भोगत्व आहे. उसने पासने आहे. सहा महिने हे असेच चालणार. सहा महिन्यानंतर चैतन्य गतिमान होऊन सर्वस्व दिसण्यात येईल. आसनावरून सुटलेले तत्त्व हे आपले कर्तव्य करणारच ! त्यात शंका घेऊ नये. जे कर्तव्य आपण करीत आहात, ते करीत राहणे. तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे ! या कर्तव्यातून यश हे जरूर आहे. ©️
