श्री विठ्ठल – आपल्या दिनांक: २२ जुलै १९७२ च्या प्रवचनातून सांगतात, “एक (१) म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एकलय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण, कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे.”
दिनांक:१०. १०. ७५ च्या आपल्या प्रवचनात श्री समर्थ मालिक म्हणतात, “प्रथम चैतन्य आकार – बिंदू, त्यापासून धुनधुनकार ! धुंधुंकारापासून ओंकार, नंतर हा जगताचा पसारा झाला. ओंकाराची निर्मिती झाल्याशिवाय जगाची निर्मिती झाली नाही. धुंधुंकारापासून ओंकार अन ओंकारांचे पोटी महामाया. महामायेपासून त्रिगुण निर्माण झाले. नंतर सृष्टीची उत्पत्ती झाली. मग ओंकार हे तत्व नसते, तर तुम्ही कोणाला पाहिले असते, म्हणूनच तिला महामाया म्हटलेले आहे. मग तुम्ही सत माया म्हणा, अगर काहीही म्हणा !
