श्री समर्थ मालिक – अनुग्रह – अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे त्याचे कर्मसंचित दूर सारून त्याला सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती कृती कितपत ठाम आहे हे पहावयाचे असते. ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत गतीत राहिले पाहिजे.
सेवेकर्यांना, महान महान तत्वांना, ऋषीमुनींना अनुग्रहाची गती आहे. आदेश सुटल्यानंतर अनुग्रह, अनुग्रह दिल्यानंतर ॐ काराचे बीजारोपण म्हणजेच नामाचे प्रथम निवेदन दिले जाते. तदनंतर तो सताचा सेवेकरी बनतो. त्याच सेवेकऱ्याची पुढे सद्गुरु बनण्याकडे मार्गक्रमणा असते.
अखंड तत्व म्हणजे सद्गुरु – जे आसनावर आरुढ आहेत ते !
एकमेकांनी एकमेकांच्या हाताला धरून जावयाचे असते, गती घ्यावयाची असते कि मी कसा आहे? त्याचे वर्णन येथे करुया नको.
सद्गुरु म्हणजे काय? मानवांना मानवाप्रमाणे सांगावयास पाहिजे. कारण काही जुने अनुग्रहित सेवेकरी आहेत. प्रथम अणूचे वळण लागावयास पाहिजे. नंतर अणूच्याही पलीकडे जावयाचे आहे. पण धीर धरा. हे ताबडतोब होत नसते. त्यासाठी कर्तव्य करावयास हवे.
आपण सर्वस्व एकच आहोत असे सेवेकरी का म्हणत नाहीत? मला अनुग्रह झाला म्हणजे सेवेकरी हुरळतो. आनंदीत होतो. तर जे हुरळत नाही, आनंदीत होत नाहीत असे ते सद्गुरु तत्व आहे. सर्व ठिकाणी भरूनही उरलेले आहे. ज्यांना अनुग्रह झाला, त्यांना माहित आहे. बाकीच्यांना कर्मसंचिता प्रमाणे मिळणार आहे. (समाप्त) ©️
