श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल कर. बरेच जण देवळात जातात, कोणी लोटांगण घालून घेतात तर कोणी जोरजोरात घंटा नाद करतात आणि आपली देवावरची श्रद्धा, भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवळातली दगडाची मूर्ती काही करते का हो? परंतु जागृत मूर्ती मात्र सर्व काही करते. आत वास करणारे म्हणते,” अरे जे काही करतोस हे सर्व तू करतोस.” त्यावेळी ते तुझ्यात वास करणारे आहेत त्याची तू जाण घेतोस का?
काही लोक आपण पाहतो की कपाळाला गंध टिळे लावून स्वतःला पांडुरंगाचा सेवेकरी म्हणवतात आणि भजने, कीर्तने करतात. परंतु तुम्हीच सांगा अशाने पांडुरंग प्राप्त होतो का? आणि हे करत असताना तुमचे आतले मन स्थिर राहू शकते का?
अरे, बाह्य अंगाने निरनिराळे वेश परिधान करून आपले मन स्थिर राहू शकेल का? अरे, आत वास करणाऱ्या सताचा, सद्गुरूंचा माग तुम्ही काढू शकणार आहात का? तुमच्या मनाची एवढी कुवत आहे का? काही सेवेकरी दरबारातून घरी गेल्यानंतर सद्गुरूंबद्दल काही प्रणव काढतात, त्यांना वाटते सद्गुरु आपल्या बरोबर नाहीत, त्यांना थोडेच कळणार आहे? यातच खरी मेख आहे…©️
