मानव हा ईशाचा अवतार आहे. मानव योनीमध्येच अवताराची सुरुवात असते. त्याचा आढावा अगोदरच घडलेला असतो. आढाव्याची घडण अगोदर तयार असते आणि त्याप्रमाणे कृतिमान होत असेल, तरी त्याला सुखदुःखाचे तडाखे त्याप्रमाणे बसतात. त्याने एकच लक्षात ठेवणे, कशासाठी ही जीवन यात्रा आहे? त्याने सत् शुद्ध भावनेने सद्गुरु चरणी लिन होऊन, सुख दुःख हे संचिताचे खेळ आहेत, हे सर्वस्व मायावी खेळ आहेत, असे समजावे.
त्याला सत मार्ग, सत् मिळाल्यानंतर, कितीही दुःख झाले तरी त्याची तमा त्याने करू नये. त्याला एकच दिसावे, ते म्हणजे आपले सद्गुरु ! त्याने दुसरे काही पाहू नये. कितीही संकटे निर्माण झालीत, तरीपण जो सत सेवेकरी असेल, सद्गुरु बोलाप्रमाणे वाटचाल करीत असेल, तर त्याला त्या संकटाचे काही वाटत नाही. हे सर्वस्व प्रकृतीचे चाळे आहेत, असे समजून तो त्याचा विधीनिषेध बाळगीत नाही. त्याची तमा मानवाने करू नये.
प्रत्येक मानवाच्या पाठीमागे पूर्व संचिताचा ठेवा आहे. जो मानव सद्गुरु बोल जतन करून जीवन यात्रेत सद्गुरु आदेशाप्रमाणे सहज गतीने वाटचाल करतो, त्याच्या पूर्व संचिताचे खंडन होऊन, तो त्या ठिकाणी जातो.
आता आपणाला महान कार्य करावयाचे आहे असे श्री प्रभू रामचंद्र आपल्या श्री सद्गुरु माऊलींना म्हणताहेत. मानवाची मानवता सिद्ध करावयाची आहे. हे महान कार्य आपल्या शिरावर आहे. आता मठ स्थापन झाला आहे (वालावल आश्रम) त्याच्या पाठीमागे महान कृती आहे. हे पूर्वी (वालावल आश्रम) महान असे क्षेत्र होते. आत्ता सुद्धा हे महान क्षेत्र होणार आहे. त्या ठिकाणी आमच्या अवतार कार्याच्या वेळी महान ऋषींचा आश्रम (श्री वशिष्ठ गुरुदेव पितामह) होता. त्यांचा परिवार पण फार मोठा होता. ज्या वेळेला लंकेहून सीतेसह येणे झाले, त्यावेळेला या आश्रमाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष या ठिकाणी जाणे झाले. अशी ती शुद्ध आणि पवित्र भूमी आहे. पुढे काही काळ हे ठिकाण महान क्षेत्र म्हणून वावरत होते. पुढे पुढे स्थित्यंतरे होऊन होऊन, आता नामाभिधानानेच वर्णन करावे लागते. त्या ठिकाणी महान पदाचे ऋषी होते. ©️
