भक्ती – भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा पिटणे हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप आहे. ती जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे, हे जर ओळखले, तर त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, ज्याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला जरी दूर खेचण्याचा प्रयत्न केला, तरी दूर खेचता येणार नाही. जे रंगढंगात निमग्न झाले, त्याला सत भक्तीची गोडी लागणार नाही.
भक्ती ही उद्धारासाठी आहे. जो स्वतः उध्दरून जातो, तो जगाचा सुद्धा उद्धार करतो. ज्याला उद्धार म्हणजे काय हे कळत नाही, त्याला कळवण्याची जरुरी नाही. ज्याला वाटत असते, माझे काही तरी निराळे आहे, त्याला सांगण्याची जरुरी नाही. ही सत भक्ती आहे.
गुरुतत्त्व मानापानाला कधी हपापलेले नाहीत. सत मार्गी जाणाऱ्या मानवाला सत मार्गाला लावण्यासाठी हे सत तत्व प्रयत्न करीत असते. याच्याशिवाय बाकी तत्त्व आहे का? याचे शोधन करा.
ज्या व्यक्तीला शरण आहात, ती कशी आहे, हे पाहण्याचा, सेवेकर्यांनो प्रयत्न करा व सेवेकऱ्यानो ठाम राहा. मी ज्यांना शरण आहे, तेच सत आहे. अशा भावनेने ठाम राहून त्यांच्या संदेशाप्रमाणे सेवेकऱ्याने वाटचाल करणे हा आदेश आहे. याप्रमाणे मी अपेक्षा करावी का? या ठिकाणी क्षणोक्षणी, पावलो पावली, एकच दिवस नाही, सदा चमत्कार दाखवू लागलो, तर माणसांची रीघ लागेल. बसायला जागा मिळणार नाही. भक्ती होणार नाही. मायावी मानवांची रीघ लागेल. मग त्यांना शांती मिळेल का? तेव्हा आहे हे उत्तम आहे ! (समाप्त) ©️
