श्री संत नामदेव महाराज –
जगात काय श्रेष्ठ आहे? देव, दानव की आणखी काही श्रेष्ठ आहे, हे भक्तगणांनी ओळखायला पाहिजे. भक्तीचे मूळ ज्यांना सापडले त्याने मात्र ते कदापीही सोडू नये. चमत्काराच्या आधीन जाऊ नये. भक्ती ही चमत्कार रहित आहे. भक्ती करणे हे मानवांचे आद्य कर्तव्य आहे. भक्तीचे मूळ ज्या ठिकाणापासून मिळाले, ते ठिकाण सोडू नये.
आम्ही अज्ञानाने विठ्ठलाला मानीत होतो. पण माझ्या सद्गुरूंनी प्रत्यक्षात सर्वस्वाची गती देऊन दाखविले. ते सर्वस्वाचे निधान आहेत. स्वयमेव भरलेले तत्त्व, सर्वस्व ठिकाणी कसे भरलेले आहे, कसे वावरत आहे हे त्यांनी दाखविले. मी त्यांचे चरण कधीही सोडले नाहीत. आम्ही जी कर्तव्यें केलीत, ती त्यांच्याच कृपेने केलीत. माझे सर्वस्व म्हणजे खेचर स्वामी हेच होते.
स्वामी म्हणजे काय?
स्वयमेव तत्व आहे. तेच स्वामी ! तेच अखंड पद ! त्यालाच आम्ही सर्वस्व म्हणतो. जसा भक्त, तसे ते ! जशी भावना, त्याप्रमाणे दर्शन मिळते.
भक्तीचे मूळ न कळल्यामुळे मानवात वाद निर्माण होतो. याला भक्ती म्हटलेले नाही. अहंकार सर्वांना आहे. पण तो कसा? रामाला अहंकार होता आणि रावणाला अहंकार होता. पण दोघांच्या अहंकारामध्ये फरक होता, म्हणून अहंकार सात्विकतेने नटलेला असावा. सद्गुरु विषयी अहंकार बाळगा, पण सात्विक अहंकार बाळगा ! (समाप्त) ©️
