श्री समर्थ मालिक – नाही, मी लहान नाही, मी मोठा असा मी आहे. म्हणाल तसा मी आहे. सेवेकऱ्याच्या पात्रतेप्रमाणे सर्व घडत असते. मात्र सेवेकऱ्याने त्याप्रमाणे वाटचाल करावी हे संदेश आहेत. एकच खुणगाठ बांधणे कि ज्या आकाराला मी शरण आहे, त्याला विसरू नये. ज्या आकाराने खूण दाखविली, त्यांचे दर्शन मिळाले पाहिजे.
ज्या आकाराला शरण आहात, तेच आसनावर आरुढ आहेत. मग ध्यान कोणाचे करता? वाल्याच्या हातात माणसे मारण्याची काठी होती. त्याला पश्चाताप झाल्यानंतर, त्याच ठिकाणी तो बसला. नारदाने त्याला नाम दिले. मग त्या शुष्क काठीला पालवी फुटली. नंतर नारद आणि मी, त्या ठिकाणी गेलो. मी वाल्याला हाक मारली. पण वाल्याने माझ्या हाकेला ओ दिली नाही. नारदाने हाक मारली, तेव्हाच त्याने डोळे उघडले. म्हणून ओळखीचे धीर गंभीर प्रणव कुठून येतात हे सेवेकऱ्याने लक्षात ठेवणे. न पेक्षा महामायेच्या हातात सर्व सूत्रे आहेत. कारण तिला अधिकार दिलेले आहेत. तो अधिकार ती दाखविते. तेव्हा सेवेकर्यांनी फसू नये.
सेवेकरी सद्गुरू चरणात ठाम, सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असा असेल तर त्या ठिकाणी मायेचे काही चालणार नाही. त्या ठिकाणी ती उभीही राहणार नाही. मात्र दिलेली खूणगाठ सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवणे. ते चकाकले की ज्योत उजळलीच ! याप्रमाणे वाटचाल करणे व आपला मार्ग आपणच आक्रमण करणे.
उ:षापाचा काळ अजून दोन वर्षांचा आहे. वनवा लागल्यानंतर सुक्या बरोबर ओल्यालाही झळ लागते. तशी झळ लागेल. ओला वृक्ष आहे त्या ठिकाणी गारवा लागतो. तसा सेवेकऱ्याच्या ठिकाणी गारवा असेल तर त्याला त्रास होणार नाही. महाराष्ट्राची पुढे फार उज्वल तऱ्हा आहे. ज्ञानेश्वरांच्या संदेशाप्रमाणे हे व्याप चाललेले आहेत. हल्लीच्या काळी असे भक्त नाहीत. आर्यवर्ताचा काळ असा नव्हता. त्यांनी जडत्व संपत्तीची कधी इच्छा केली नाही. पण हल्लीचे सेवेकरी जसे बोलतात त्याप्रमाणे आहेत काय? ©️
