श्री विठ्ठल – वनवा लागल्यानंतर सुक्याबरोबर ओल्यालाही झळ लागते. तशी झळ लागेल. ओला वृक्ष आहे त्या ठिकाणी गारवा लागतो. तसा सेवेकऱ्याच्या ठिकाणी गारवा असेल तर त्याला त्रास होणार नाही. महाराष्ट्राची पुढे फार उज्वल तऱ्हा आहे. ज्ञानेश्वरांच्या संदेशाप्रमाणे हे सर्व चाललेले आहेत.
हल्लीच्या काळी असे भक्त नाहीत. आर्यवर्ताचा काळ असा नव्हता. त्यावेळी त्यांनी जडत्व संपत्तीची कधी इच्छा केली नाही, पण हल्लीचे सेवेकरी जसे बोलतात त्याप्रमाणे आहेत काय? वागतात काय? मायावी फेकलेली ज्योत मायावी तऱ्हेने वावरलीच पाहिजे. तारुण्याचा भार असे पर्यंतच सर्व असते, तारुण्याचा भार ओसरल्यानंतरच भगवंताची आठवण होते.
सेवेकरी निष्काम गतीने राहील, निष्काम स्थितीत राहील तर कोणत्याही गोष्टीची न्युनता व प्रकाशाची वेगळी तऱ्हा राहणार नाही. तरी अशा तऱ्हेने धोरण ठेवणे व वागणे हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे.
जे होते ते बऱ्या करीताच होते. ज्याप्रमाणे मानवांची तऱ्हा, त्याप्रमाणे सर्वस्व घडत असते. आम्ही परम तत्व असलो, तरीही महान तत्वाचे सेवेकरी आहोत. त्यांच्याशिवाय काही एक हालचाल होत नाही, काही एक घडत नाही, म्हणून नामदेवाला गती देऊन कर्तव्य करून घेतले. मानवांच्या कृतीमुळे महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. मानवच मानवांना सरळ वागू देत नाही. ओळख ठेवीत नाहीत. ओळखीने चालत नाहीत. तोंडाने चांगले बोलत नाहीत. सरस्वती दिली त्याबद्दल त्याला काही समजत नाही. हल्ली मानवांना एक मोठी गोष्ट वाटते ती म्हणजे मदिरा ! ती त्यांना फार प्रिय आहे. जास्त संख्येने असे मानव आहेत. काही असो, कर्ज काढून देखील मदिरा प्राशन करतीलच. अशा तऱ्हेचे मानव आहे. महाराष्ट्र रुपी हे भांडे गंजले आहे, ते स्वच्छ झाले पाहिजे. म्हणजे पाणी तरी त्यात स्वच्छ राहील. ©️
