श्री समर्थ मालिक – या नामावर श्रद्धा राहणे कठीण आहे. कोणी म्हणतो, ती हवा आहे. ती गेली म्हणजे सर्वस्व कारभार आटोपला, पण हवेत किती अर्थ आहे. त्यात किती सामर्थ्य आहे, हे पाहण्याचे मानवाचे सामर्थ्य नाही.
मानव हा मानाला हपापलेला आहे. क्रोधाने बरबटला आहे. मग, त्याला या नामाची गती कशी मिळणार? जो मानव अहंकाराने बरबटला, मी पणाच्या पाठीमागे गेला, तो या तत्त्वात रममाण होऊ शकतो का आणि होणार आहे का? यावर याची श्रद्धा बसणार नाही.
मानवाला आजकाल चमत्कार पाहिजे. चमत्कार झाला तर या ठिकाणी देव आहे असे तो मानतो. अशा तऱ्हेने मायेच्या पंजात सापडलेला मानव, हा तत्वाच्या ठिकाणी रममाण होणे दुरापास्त आहे. यालाच निवृत्तीने “अनंत देव आपण”, अनंत आपण म्हटलेले आहे.
अवतार धारणा कशासाठी करावी लागते? याचे ज्याला वर्म सापडले आहे, तो पूर्णात पूर्ण मिलन आहे. सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त आहे याची खूण सत पुरुषांना सापडली. एकच चैतन्य रोमारोमात भरले आहे अशी सत् पुरुषांची खात्री झालेली आहे. मानवांना पटणार नाही म्हणून संतांनी सांगितले, योगीयांची खूण योगी जाणे ! हे अनगडांना पटणार नाही. त्यांच्या डोक्यात भरविण्यास पुष्कळ त्रास पडेल. आसना सानिध्यात ज्योती येणार आहेत. मग या आसनाची महती सेवेकरी चाखतील. याची देही याची डोळा पाहावयास मिळेल. पण सेवेकरी दृढतेने राहावयास हवेत. ज्यांना शरण आहात, त्यांच्यातच लिन होण्याचा प्रयत्न करा. तेच सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. (समाप्त) ©️
