श्री समर्थ मालिक – अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते. पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने पाहणे होय. त्या ठिकाणी नाते शोधले जात नाही, म्हणून हे उत्पन्न होत असते. मी कोणीतरी विशेष आहे अशी भावना निर्माण होते. मग अहंकार, हेवेदावे, अहंपणा निर्माण होतो. ही भावना जोपर्यंत मरत नाही, म्हणजे गटबाजी, कुचेष्टा अन् थोडीशी का होईना अधिकार वाणीने बोलण्याची सवयही असते. म्हणून तत्त्व भिन्न कि प्रकृती भिन्न? ही विचारणा केली.
प्रकृती भिन्न आहे म्हणून हा गोंधळ होत आहे. वाढत आहे. मग सेवेकर्यांनी तत्त्वाप्रमाणे चालले पाहिजे की प्रकृतीच्या गतीप्रमाणे चालले पाहिजे? तत्त्वाप्रमाणे. मग तत्वाप्रमाणे चालाल अशी अपेक्षा करावी का? मान्य आहे. याप्रमाणे सेवेकरी होऊ लागला तर त्या ठिकाणी लाघवीचे काही चालत नाही. मीच थोडीशी पाहणी करतो. सेवेकरी तत्त्वाच्या ठिकाणी ठाम झाले तर मला काही करता येत नाही.
मी आकारी आहे अन निराकारी पण आहे. पण एकच म्हणावयाचे, जे आकाराकडून संदेश मिळतात, सांगणे होते त्याची जोपासना सेवेकर्यांनी केली आहे की नाही कोण जाणे. तरी सेवेकर्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तणूक ठेवणे. कबूल आहे? त्या ठिकाणी थोडासा का होईना विचार करावा लागतो. सेवेकरी थोडासा मनाच्या आधीन बनला, मनाप्रमाणे चालला मग त्या ठिकाणी थोडेसे लाघव करावे लागतात. मनाच्या आधीन बनणारे सेवेकरी नसतील, नाही तर सेवेकरी एवढ्या पाठीमागे राहिले नसते. जे जे सेवेकर्याच्या मनाला येईल त्याचे कोडकौतुक समर्थ पुरवतात. पुरवले जाते. मनाचे आधीन असले तरी त्या सेवेकऱ्याचे कोडकौतुक पुरविण्याचे बाकी ठेवले आहे का? सेवेकरी मी रहित, मनाचे जोगे सिद्धी पावे असे होतील, पण सेवेकरी होत नाहीत. त्याला मी काय करावे? बघा. प्रयत्न करा. आसनाधीस्त काय सांगतात ते ऐका. विचारवंत व्हा अन् काही तरी करा. एवढे संदेश देत आहे. शांतता आणि समता या ठिकाणी ठेवलीच पाहिजे. आता इथून पुढे सेवेकर्यांनी विचार करण्याचा प्रयत्न करावा. ©️
