श्री संत नामदेव महाराज – दुसरी गोष्ट, रुधीराचे दुधात मंथन करून शुभ्र केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याचे घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते.
आता या तिन्ही वस्तूंचा कधी सुगंध सुटला आहे का? तद्नंतर तेच लोणी एखाद्या भांड्यात घालून अग्निवर ठेवले की मग सुगंध सुटतो. तो कुणी पकडला आहे का? असे जे सत आहे, ते सुगंध युक्त आहे. ते कोणाला सापडले आहे का? जे त्या ठिकाणी लयबद्ध झाले ते परत आले नाहीत. म्हणून सद्गुरु हे सर्वस्वाचे निधान आहे. ते वाटेल त्या तऱ्हेने कस घेतील. पण सेवेकऱ्याला वाया घालविणार नाहीत.
अत्यंत दयाघन असे ते तत्व आहे. त्यांच्या लिलेचा अंत नाही. ज्यांना ते सापडत नसेल, त्याने सुगंधात तरी निमग्न होण्याचा प्रयत्न करणे ही विनंती आहे.क्षणात निराकारी बनतील, क्षणात आकार धारण करतील. सदोदित स्थानवंत असे हे तत्व आहे. असे असून सुद्धा, निर्गुण निराकार पदानेही व्यवहार करतात. माझ्यासारख्या सेवेकऱ्याने आणखी किती वर्णन करावे? म्हणून येथील सेवेकरी महान भाग्यवान आहेत.
कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का? कोणी म्हणतो आम्हाला दर्शन नाही, कोणी म्हणतो प्रकाश नाही. येथील सर्वस्व सेवेकर्यांना दर्शन मिळालेले आहे. सत् हे अगाध लीलाधारी आहेत. ते कुठेही दर्शन देतील, पण हे सेवेकर्यांनी ओळखले पाहिजे. जशी प्रकृतीची पात्रता, त्याप्रमाणे घडण घडत असते. (पुढे सुरू…३) ©️
