श्री विठ्ठल – मन गढूळ कां होते? मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना ! एका भक्ताने म्हटलेले आहे, “दिल गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर ||” त्याचे शेले मी विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची कामे करायला जड पडतील काय? संशय, कल्पना यामुळे त्यांना शंका येते. जोपर्यंत संशय, कल्पना रहित ते होत नाही, तोपर्यंत भक्तीत रममाण होणे शक्य नाही.
सद्गुरुनी अखंड ठेव दिली. सर्वस्व दिले? पण शंका आली ती का? तर मन गढूळ झाले. मग सद्गुरूंपेक्षा आणखी कोणी तत्व जगात आहे का? तर नाही. मन सद्गुरु चरणात निमग्न करण्याचा प्रयत्न करा. तदनंतर आकारी आणि निराकारी कळेल.
सद्गुरु चरणात निमग्न झाल्यानंतर मग एकादशी याचा अर्थ कळणार नाही का? दहा इंद्रिये मनाच्या ठिकाणी लय करणे अन् ते मन सद्गुरू चरणावर वाहिल्यानंतर मग अकरावे ठिकाण वेगळे का आहे का? हे सर्वस्व बहाल केल्यानंतर त्रिकुटी स्थिर होते. तिथून मन अकराव्यात लय होते हीच एकादशी, मग एकादशीचा अर्थ कळेल की नाही?
१० + १ = ११. त्या एकाचाच अंत घेणे. त्याच्यानंतर एकादशी म्हणजे १० + ० + १. शून्य म्हणजेच ओंकार ! सेवेकऱ्यांना आसनावरून गणित रूपाने सांगितले, कृतिमान होण्याचा प्रयत्न सेवेकर्यांनी करणे. १ म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एक लय होतो. मग राहतो तो निर्गुण निराकार !
अनंतानी अनंत तत्वे या पृथ्वी तलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण? कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे. ©️
