श्री समर्थ मालिक – अविद्येचे मूळ पर ते उपडोनी सांडू | आशा मनीषा कृष्णा काम क्रोध कुरवंडू || ज्याने अविद्येचे मूळ उखडले, आशा, मनीषा, तृष्णा, काम, क्रोध यांची कुरवंडी केली, त्यांनीच हे म्हटलेले आहे. तेव्हा ते लिखाण पाहून सेवेकरी तसे प्रयत्न करीत आहेत का? अविद्येला, मूळ मायेला उपटून टाकण्याचा प्रयत्न होईल का? जोपर्यंत सेवेकर्याच्या अंत:र्यामी समतेचा पाझर फुटत नाही, तोपर्यंत मूळ उपटणे कठीण आहे.
महामायेचे मूळ उपटून टाकण्यासाठी कृती करावयास पाहिजे. वर्तणूक कशी पाहिजे? तिचे मूळ उपटून टाकले तरच, समर्थ पाठीमागे उभे राहतात. याप्रमाणे सेवेकर्यांची कृती असेल तर अविद्येचे मूळ उपटू शकता. आशा, तृष्णा याची कुरवंडी करू शकता. सेवेकरी ध्यानात बसला तर मन कुठे कुठे जाते? परत त्याला जागा करून ठिकाणावर आणावे लागते. मग असा सेवेकरी अविद्येचे मूळ उपटून टाकू शकतो का?
प्रत्येक सेवेकऱ्याने, मग तो कोणीही असो, आपले कोठे चुकते हे प्रथम शोधावे. आपणा ते नमावे | काम क्रोधास दंडावे | मदमस्तर खंडावे | तरीच पावावे माझे पद || असे झाले आहे का? कोणत्या सेवेकऱ्याचे असे झाले आहे? अन् अशा तऱ्हेने सेवेकरी वाटचाल करतील तर मग मात्र अविद्येचे मूळ उपटून टाकू शकतो. सेवेकऱ्यांच्या ठिकाणी अविद्येचे मूळ उपटण्याचे, काम, क्रोधाची कुरवंडी करण्याचे सामर्थ्य नाही. पण त्याची जर पात्रता असेल तर त्याच्यासाठी समर्थच अविद्येचे मूळ उपटून टाकतात. सद्गुरु मूळ उपटून टाकू शकतात. पण केव्हा? अन् कधी? म्हणून आपण त्या पात्रतेचे झाले पाहिजे. तेवढे आपण कमाविले पाहिजे. याच जन्मी सेवेकरी अविद्येचे मूळ उपटून टाकू शकेल असे नाही. ©️
