श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे, अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी लागतो.
काही येणाऱ्या ज्योती आहेत. त्या ओघाने येणारच आहेत. येथील सेवेकऱ्यांना सद्गुरु तत्व पटले असेल तरी आपली श्रद्धा ढळू द्यावयाची नाही. माया सेवेकऱ्यांचा कस घेते आहे पण ती घेऊन घेऊन तरी किती कस घेणार?
सेवेकऱ्यांनो, तुम्ही कोणीही नाहीत. एकच आत्मज्योत तुमच्या स्वरूपात फेकली आहे म्हणून तुमच्यावर मोठा पडदा टाकून तुमच्याकडून हे करून घेत आहे. फक्त एकच ध्यानात ठेवणे, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तत्त्व जरी महान असले तरी त्याची कृती म्हणजेच त्यांचे कर्तव्य जर यथायोग्य नसेल, तर अशा तत्वाला काहिही अर्थ नाही. म्हणून कर्तव्यता कशी पाहिजे? तर सत् शुध्द. कर्तव्य करताना सत् आचार, सत् विचार, सत् शुद्ध भावना, सताप्रति निष्ठा, सताप्रति आस्था असावयास हवी, तरच कर्तव्य श्रेष्ठ दर्जाचे होईल. (समाप्त)©️
