श्री समर्थ मालिक –
महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे. सेवेकऱ्यांनी मनाने सत् शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा. एवढे तरी करा. याच जन्मी कमवायचे असेल तर आत्ताच कमवून घ्या. भंडार भरलेला आहे पण लुटणारा पाहिजे, नाही पेक्षा त्याचा उपयोग काही नाही, लाभ तर दूरच राहिला.
संचिताची घडण ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे सेवेकर्यांना माया मिळते. हे जरी असले तरीपण ज्यांच्या संचितात नाही, परंतु ते सताचे निस्सीम भक्त आहेत, त्या सेवेकऱ्यांना केव्हाही उपाशी ठेवणार नाही. मायेला निर्माण करणारा तुमच्या सानिध्यात आहे, तर मग माया काय करणार?
माया म्हणजे काय? माया कोठे जाणार आहे? इतकेच आहे, बऱ्याच वर्षापासून दरबारच्या सेवेकऱ्यांना संदेश आहेत – एकाच जीवात, एकाच प्रेम रज्जूत आपण डूंबून रहावे ही समर्थांची अपेक्षा असते. हेवे-दावे, मनाचा कलुषितपणा, कुणालाही नाराज न करणे व आपली कृती तशी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही. माझा कोणताही गुरुबंधू भगिनी नाराज होऊ नये अशीच मनाची धारणा प्रत्येक सेवेकर्यांने ठेवली पाहिजे. आपले मन शुद्ध स्फटिका सारखे ठेवले पाहिजे तरच आत्ताच्या महान कर्तव्याला शोभा येईल. मनामध्ये गढूळपणा ठेवल्याने शोभा येणार नाही, सद्गुरु चरण प्राप्त होणार नाहीत. ©️
