तर निर्विकारापासून निर्मिती ! प्रथम चैतन्य निर्विकार, तेथून धुनधुनकार, येथून ओंकार म्हणजेच आकार निर्माण झाला. आकार निर्माण करावा लागला. आकार निर्माण केला कोणी? आकार हेच ओंकार ! पण तो आकार ओंकार स्वरूपी बनला तर ! ॐकार स्वरूपी बनल्यानंतर त्याच्यापासून सृष्टीची रचना झाली. ॐ कारा पासून माया म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण निर्माण झाले. तदनंतर पृथ्वीची रचना झाली. मग आकारी कोण आणि निराकारी कोण? म्हणून आकार मायेत जरी असला, तरी मायेत राहूनच कर्तव्य करणे त्याचे आद्य कर्तव्य आहे. आकाराच्या पाठीमागे माया कशी येईल हे पाहिले पाहिजे. म्हणून आकारी आणि निराकारी दोन्हीही एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणूनच हे जे सत् आहे त्याची खूण, जागा आकाराच्या सहाय्याने दाखविली जाते. ज्याला याची गती नाही, तो १७ वाटांनी पळतो. त्याचे गुडघे फुटले तरी हे सापडणे कठीण आहे. कारण त्याचे संचित कसे असते म्हणून सेवेकर्यांनी हेच ओळखावे.
मग सकाम भक्ती योग्य आहे का, निष्काम भक्ती योग्य आहे? आपले सेवेकरी निष्काम आहेत का? तर नाही. हे उघड आहे. निष्काम आहेत म्हणावे तर येथून खाली गेल्यानंतर त्यांना विवंचना लागतेच ना? काही सेवेकरी म्हणतात, हेही नाही आणि तेही नाही. पण त्यांना उपाशी ठेवले आहे का? घडण ही संचिताप्रमाणे घडत असते. सेवेकरी निष्काम जरी नसला तरी निष्काम होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या शक्तीने निष्काम होणार नाहीत हे मी जाणतो. प्रणव टाकणे सोपे असते, पण त्याप्रमाणे कर्तव्यात सेवेकरी आहेत का? (समाप्त)
