श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व तो मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हीच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला त्यांचा मानवी कर्तव्याप्रमाणे नि:पात केला.
या भारत भूमीमध्ये माझा उत्सव मोठ्या आपुलकीने साजरा करत असतात. असे जरी असले तरी मला सुद्धा कोणी सूत्रधार आहे, हे मानवाने लक्षात ठेवावे. असे जे अनंत आहेत, त्यांच्या आदेशाशिवाय झाडाची पानेही हलत नाही. असे जे सूत्रधार ते आपले सूत्र अदृश्यपणे हलवित असतात. पण दृश्य तत्त्वाला त्याची जाण असावी लागते. त्याप्रमाणे मी माझे कर्तव्य सत या चाकोरीतूनच केले आहे असे मला वाटते.
रथी महारथी या आसनाजवळ लयबद्ध आहेत. जसे अवतार कार्य तसे या आसनावर प्रगटीकरण होत असते. या आसनाचा अंत ना पार असे हे आसन आहे. वशिष्ठ गुरुदेव हे माझे सद्गुरु आहेत. त्यांचेही सद्गुरु आहेत. असे हे आसन आहे. त्यांच्या संदेशाप्रमाणे आम्ही कर्तव्य परायणता साधतो. त्याच्या शिवाय कर्तव्य होत नाही. म्हणून जगात सत आहे.
रामावतारात माझ्याकडून कर्तव्य करून घेतले. त्याचप्रमाणे कृष्णावतारातही माझ्याकडून कर्तव्य करून घेतले. पुढेही ते नामा निराळे राहून कर्तव्य करून घेणार अन् आत्ताही घेत आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. तेव्हा या भारत भूमीच्या रक्षणार्थ सर्वस्वाचे निधान होऊन अवतार नटवले. अशी ही भारत भूमी अध्यात्म केंद्र होती. आता स्थिती निराळी आहे. सताचा छळ होत आहे. ही सर्वस्व घडण सर्व व्यापक शक्ती पाहत आहे. माझ्याच अवतार कार्यात कर्तव्य केले. पण आता गती फार निराळी आहे. त्यावेळी स्थूल अधिकार होते. पण आता अदृश्य गतीने कार्य केले जाते. कर्तव्य एकच पण तऱ्हा भिन्न भिन्न आहे अशी स्थिती आहे. त्याला कारण मानवांची असत कृती !
मी जरी राम असलो, तरी सद्गुरु सेवेकरी आहे. त्या गतीने पाहिल्यानंतर आम्हाला जे संदेश मिळतात त्याप्रमाणे कर्तव्य हाताळले जाते. मी त्रिभुवन आज सत्ताधीश असलो तरी आमच्यावरही सत्ता चालविणारे कोणीतरी तत्त्व आहेच.
भारत भूमीमध्ये अजूनही स्थित्यंतरे होणार आहेत. मानवाला अजिबात स्थिरता नाही. कारण सतभक्तीचा लोप झाला आहे. काहीना स्थिरता मिळाली आहे, ती टिकविण्याचा प्रयत्न करणे. आज जे मानव सेवेकरी सानिध्यात आहेत, ते महान भाग्यवान आहेत. या देशांमध्ये काही ठिकाणी फारच त्रास होत आहे, कारण त्यांची पापे त्यांना त्रास देत आहेत. काही ठिकाणी ही विचित्र तऱ्हा घडत आहे. त्या ठिकाणी पूर्वी निरपराध स्त्रिया व मुले यांचा नाहक बळी घेतलेला आहे. त्यांचा तो आक्रोश, लहान मुलांचा टाहो हा त्या सताजवळ पोहोचलेला आहे अन् त्याच अघोरी कृत्याची फळे आहेत.
मी जरी राम असलो तरी तुम्ही जसे कर्तव्य कराल त्याप्रमाणे अनंतांकडून फळ दिले जाते. जसे पेराल तसे फळ मिळेल. उत्तर हिंदुस्थानात अवतार कार्य नटवले त्यावेळी त्या ठिकाणी पवित्रता होती. आता ती पवित्रता कोठे आहे? गंगा, भागीरथी या नद्या पवित्र होत्या. तिच गंगा महासागराला मिळते. आता तिच्यात काही पापकर्में वाहत आहेत. याला कारण मानवांची पाप कर्में ! असेच होत होत या भूमीचा भार हलका होणार आहे. पण जे सेवेकरी आहे त्यांना स्थिर करणारे अनंत आहेत. परंतु सेवेकऱ्यांनी आपली सत चाकोरी राखली तर ! भलतीकडे गेलात मग मात्र आमचा नाईलाज आहे. पंचीकरण आहे. त्याला सर्वस्व सत्ता बहाल केली आहे. म्हणून आदेशाप्रमाणे कर्तव्य करा. या ठिकाणी हे संदेश मी आसनाधीस्तां मार्फत देत आहे. प्रथमच संदेश दिलेले आहेत. संक्रमण हे होणारच ! अघोर निपटले जाणारच ! ते कोणत्या तऱ्हेने हे सांगता येत नाही. सुरुवात झाली आहे. आराखडा तयार आहे. आता एकच संदेश, आपण अखंड नामाच्या गतीत स्थिर असणे हे आज संदेश देत आहे. (समाप्त) ©️
