Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

ॐ नमोजी आद्या ! ©️

ॐ नमोजी आद्या ! ©️

श्री ज्ञानेश्वर महाराज एकचित्त – ॐ नमोजी आद्या ! वेद प्रति पाध्या ! जय जय स्वसंवेद्या! आत्मरुपा !! या ठिकाणीं अनेक भक्त जमले आहेत. ते आपापल्या परीने सद्गुरूंची सेवा करीत आहेत. सेवेकऱ्याची पायरी जाणून त्याला सद्गुरु फळ देत असतात. ज्या दर्जाची भक्ती, सेवा असेल, त्या दर्जाने त्याला दर्शनाचा लाभ मिळेल. दर्शनाचा लाभ झाल्यावर, जो अनुभव मिळतो, तो अवर्णनीय आहे.

ॐ ही गोष्ट चर्मचक्षुंना दिसणारी नाही. त्याला ज्ञान शक्तीची जरुरी आहे आणि ही ज्ञान प्राप्ती फक्त सद्गुरुंच्या सेवेने प्राप्त होते. सद्गुरु प्रथम आपणाला ज्ञानाची जाणीव देतात.

सेवेकरी जशी आपली भक्ती सद्गुरुंवर दाखवितो, त्याप्रमाणे सद्गुरु त्या भक्ताला ज्ञानाची पायरी देत असतात आणि शेवटी ॐ ह्या शब्दातून भक्ताला दर्शन होवू लागले म्हणजे त्या सेवेकऱ्याला देवदर्शन होते. ॐ ह्या शब्दात सर्व ब्रह्म साठविले आहे आणि ह्या ॐ साठी सद्गुरु उपदेश पाहिजे. त्याशिवाय या तत्वाचा साक्षात्कार होणार नाही.

सत् म्हणजे परमेश्वर ! ह्या सतासाठी वेद निर्माण झालेत. हे वेद कोणीही उत्पन्न केलेले नाहीत, तर स्वयं सिध्द आहेत. या स्वयं सिध्द तत्वाचा बोध झाला म्हणजे आत्मबोध होतो.

आत्मबोध” म्हणजे “आत्मज्ञान” ! आत्मज्ञानासारखी गती नाही. सर्व सिध्द योगी, मुनी, ऋषी हे आत्मज्ञानी होते. त्यामुळे त्यांना ईश्वराप्रत जाता आले. तो ईश्वर सर्वभूती, सर्व चराचर व्यापून राहिला आहे. या सर्वांचे सार म्हणजे सद्गुरु उपदेश होय.

प्रथम आपण सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. म्हणजे ते सद्गुरु आपणास मार्ग दाखवितात. माझ्या पश्चात जे अनेक साधू होवून गेले, त्यांचा सुद्धा उपदेश करण्याचा मार्ग माझ्यासारखा होता. माझ्यावर तुमचा जितका विश्वास आहे, तेव्हढाच तुम्हीं तुमच्या सद्गुरुंवर विश्वास ठेवून चला.

प्रकाश खास दिसेल. आम्ही सर्व त्या साक्षीभूत परमेश्वराचे नोकर आहोत. आम्हाला प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे, पण निसर्ग नियमाला मान देवूनच आम्हास या अवनीतलावर राहता येते. आत्मबलाची काय महती सांगावी? त्या शक्तीचा अनुभव आम्हांस मिळाला आहे. तसा तुम्हांस मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल, तर सद्गुरुंवर श्रद्धा ठेवून, त्यांच्या उपदेशाने जावून, आपला आत्मोद्धार करुन घ्या. ©️

You cannot copy content of this page