श्री समर्थ मालिक – ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व, तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओंकार ! आकार हा ओंकार स्वरूप झाला मग प्रश्नच उरत नाही. मग तत्व समान झाले.
प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती एक झाली तर तू आणि मी वेगळा नाही. पण आताचा काळ मायावी आहे, म्हणून ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे.
आसनाधिस्तांना मी काही अनुग्रह दिला नाही. फक्त माझा स्पर्श झाला आहे. आसनावर माझ्या आकाराची छबी आहे, पण तत्वाचे अन् सेवेकऱ्याचे खटकले होते कि नाही? कर्तव्यावरूनच ना? ज्या वेळेला अखंड तत्वाने संदेश सोडले, ॐ कारेश्वराला बोलवा, चैतन्य उडवले होते अन् त्या वेळेला मातेचा धावा केला, तिथपासून आठवण नाही. मी फक्त तसबिरीतच आहे का? म्हणून सेवेकरी कसा आहे, कसा नाही हे मी ओळखले आणि म्हणूनच पूर्व जन्मीचे सत् कृत्य अखंड होते म्हणून हिमालयात बसवले. तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही.
परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे.
आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे. याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर आसना जवळ सांगता. पण कृतीमान असेल तर सांगण्याची आवश्यकता होईल का? म्हणूनच जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही. ते धावत नाही, सापडत नाही, कोणी म्हणतात हवा आहे, कोणी म्हणतात गंध, पण शक्ती किती आहे याची गणना कोणी केली नाही. हवा म्हणजेच प्रणव ! अन् हे ब्रह्म आकारी तसेच निराकारीही होऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण सेवेकर्यांची पाहण्याची ताकद आहे का? जोपर्यंत सेवेकर्यांनी आसनाधिस्तांना ओळखले नाही, तोपर्यंत सेवेकरी असेच लुडबुड करणार ! आपण शुद्ध स्फटिका सारखे असल्यानंतर मग त्रास होईल का? हे सेवेकर्यांनी ओळखावे. (समाप्त)©️
(श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा….!)

