श्री समर्थ मालिक – रामावताराच्या वेळी मानवांची बुद्धी व कृती ज्या गतीची होती त्याप्रमाणे माझी तऱ्हा होती. त्यावेळेला एक बोल एक वचन अशी तऱ्हा होती. पण तदनंतर काळ बदलला. कृष्णावताराच्या वेळी काळ कसा होता? याची टोपी त्याला घाला त्याची टोपी याला घाला. हे कोणासाठी केले?
भारतात सगळेच भक्त होते. कंस हा भक्तच होता. त्याच्या सानिध्यात भक्तच होते. वासुदेव देवकी हे सुद्धा भक्त होते. मग यांना वाचवून कंसाचा नाश करण्याची काय आवश्यकता होती? म्हणून त्या ठिकाणी सतशुद्ध भक्ती असते, तेथे मला काही करता येत नाही. सत् असून सुद्धा अधोगतीला गेल्यानंतर नजर फिरवावी लागते.
अवतार कार्य केंव्हा, कधी आणि कोणत्या गतीत होते? या भूमीमध्ये अतिशयोक्ती झाल्यानंतर अघोरांचा नि:पात करण्यासाठी काही काळ वेळ नसते. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सूक्ष्माचे कर्तव्य आहे, तेच फार महान कर्तव्य आहे. कारण या दंडकारण्यातील मानवांना या अघोरी तत्त्वांनी आपलेसे करून घेतलेले आहेत. अशांची सुधारणा कोणत्या तऱ्हेने करावी हे सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्णत्व भरल्याशिवाय हात घालता येत नाही. अशा अघोरांना आपण स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. हे कसे होते आहे हे आपण पहात राहणे. जे शुद्धीवर येणारे असतील, ते येतील पण, ज्यांच्या भाग्यात नाही ते केव्हाही शुद्धीवर येणार नाहीत. (समाप्त)
