या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले, नंतर सांगितले तेच तुम्ही वाचता, तेच तुम्ही कृतीत आणा. सेवेकऱ्यांजवळ अजून समतेचा पाझर नाही. अजून हेवे दावे गेलेले नाहीत. अजून एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही.
मला सांगा, एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे नाते प्रेमळपणाचे किती आहे? हे जर अखंड नाते आहे, तर आपण कसे राहिले पाहिजे? पहा, विचार करा ! आपणाला मी जे सांगतो आहे, हे गिरवत गिरवत लक्षात ठेवून, तसे तरी करा. मनाला येईल तसे करू नका, वागू नका. आसनाधिस्तांचे संदेश असतील तसे करा.
येथे सर्वांना सारखे अधिकार आहेत. हे मी मोघम बोलत आहे. समर्थांची इच्छा असतेच की आपला सेवेकरी अशा पात्रतेचा केव्हा होईल? तेव्हा, ज्याला पटेल, तोच या ठिकाणी झटेल. ज्याला न पटेल तो आपोआप फाटेल.
कृष्णावतारात अर्जुनाचे काहीतरी संचित असले पाहिजे. त्याचप्रमाणे दुर्योधनाचे देखील असले पाहिजे. दोघेही माझ्या सानिध्यात होते, मग अर्जुनालाच पाठीशी का घातले? त्याच्याकडून कर्तव्य करून घ्यावयाचे होते. भीष्म ही त्या तऱ्हेची ज्योत होती. त्याच्याच कृतीप्रमाणे त्याला फळ दिले. दुर्योधनाला त्याच्या कृतीप्रमाणे फळ दिले. या ठिकाणी प्रेम, समता, बंधुभाव असा त्रिवेणी संगम सेवेकऱ्यांच्या हृदयात असावयास पाहिजे. (समाप्त) ©️
