ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे, राजाची कांता दारोदारी भीक मागत फिरेल का? तिच्या मनाजोगी सिद्धी पावेल की नाही? का तो राजा भिक्षांदेही असतो? पण कल्पतरू तळवटी बसल्यानंतर, त्याची भावना कुठे कुठे जाते?
कल्पतरू तळवटी….. दोन मार्ग आहेत. जो सत् कल्पवृक्षाखाली बसला, तो सत मार्गाने जाणारा असतो. जो अघोर, कल्पवृक्षाखाली बसला, तो अघोर कल्पनेच्या पाठीमागे लागून हैवान बनतो. मग तो स्वयं तत्वापर्यंत पोहोचू शकेल का? पोहोचू शकणार नाही.
कल्प, कल्पना, स्वयम अन् पर म्हटल्यानंतर तुझे माझे निर्माण झालेच की नाही? म्हणून आपणाला जे साधे सोपे सुलभ आहे तोच मार्ग अवलंबन करावयाचा आहे. भयावह म्हणजे भटकतो आहे, यात काय आहे, त्यात काय आहे अशी भावना. तेव्हा जी ज्योत अशी भटकते ती सतात निमग्न होईल का?
जो सत आहे, ज्याला सताचा प्रकाश आहे, तो स्वयं तत्त्वाच्याच पाठीमागे असतो. स्वयं तत्व दिलदार आहे. पण पर जे आहे ते पळ काढतेच की नाही? या ठिकाणी आसनाच्या सानिध्यात त्याला घेतले का? तर नाही. या ठिकाणी अघोराला थारा नाही. मात्र आसना सानिध्यात आहेत त्यांनी आपल्या मार्गाची चाकोरी ढळू देऊ नये. जर ढळली तर त्याच्यासारखा अभागी तोच ! (समाप्त) ©️
