श्री समर्थ मालिक – सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. तो मोह असावा, पण कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे मानव लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.
मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर मोहवश होणार नाही. पण हि जर मेख सापडली नाही तर तो मोहवश होतो.
बाबा – दृश्य संपत्ती कोणा पासून मिळते?
मालिक – सांगतो. सत् कुठे आहे?
बाबा – सत् हे पंचमहाभूतांच्या कवचात आहे.
मालिक – म्हणजे ते हृदयात आहे. हृदयात असल्यानंतर काय करतात?
बाबा – नामस्मरण !
मालिक – आणखी काय करतात?
बाबा – सर्वस्व कार्य करतात. काम करतात. पगार घेतात.
मालिक – कशामुळे?
बाबा – सत् आहे त्यामुळे.
मालिक – सेवेकरी म्हणतो, मी कमवतो. मी करतो. मग कोणाच्या सत्तेने कमावतो? कोणाला वाहतो? अन् हीच ती गुढ अविद्या माया होय. हा जो पडदा टाकला त्या भ्रमंतीमध्येच मानव गुरफटून गेला आहे. दृश्य मायेला लंपट होऊन, माझे माझे म्हणत आहे व अदृश्या पासून दूर होत आहे. मात्र हि मेख ज्यांनी ओळखली, त्यांना त्याचे शुभही नाही आणि अशुभही नाही. ते आदेशाप्रमाणे फक्त कर्तव्य करीतच राहणार. बाकी उचापती करीत नाहीत.
या दरबारातील सेवेकरी ज्ञानी पण आहेत अन् अज्ञानी पण आहेत. ज्ञान देण्यासाठी आसनावरून प्रवचने होत असतात. हे ज्ञानच आहे. ते घेतल्यानंतर प्रश्न उत्तरे पण करतात. बोलणे सोपे असते. परंतु कृतीमान झालेला सेवेकरी दिसतो आहे का? तो मायेच्या व्यापातून निष्काम आहे, असे म्हणू का मी? मग जे गुढ आहे, ते त्याला कळणार नाही. या भानगडीत पडू नये. विचारले ते सांगितले, त्याप्रमाणे प्रयत्नशील असावयास पाहिजे. परब्रम्ह तत्व जरी असले, तरी सेवेकरी माझ्यावर व मी सेवेकऱ्यांवर अवलंबून आहे. सेवेकऱ्यांनी मला जवळ घेतले पाहिजे. असे जर केले तर त्याला दूर लोटता येणार नाही. मी दूर जाणार नाही. (समाप्त)©️
