सद्गुरु आणि आपण वेगळे आहोत असे काही आहे का? सद्गुरु समान बनले पाहिजे. ते अंत:र्यामीच आहेत म्हणून आपण बोलता, चालता, नोकरी करता, पण अंत:र्यामीचे तत्व बाहेर पडल्यानंतर, मनाच्या मनमौजा चालतील का? मग आणखी सद्गुरु आणि मी वेगळा आहे असे म्हणता येईल का? सद्गुरु चुणूक देऊन, प्रकृती कडून बोल फेकतात.
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी | शिकविता धनी वेगळाची || पण तोच जर अघोरी असेल तर शिकविणार नाहीत. अशाला माया डिवचणी देते. मग सद्गुरु माऊली बोलते, आता हवे ते कर ! तुला पुढे कुठे टाकावयाचे हे मला माहित आहे. मनाच्या मन चाकोरीने मानव जातो, तो हजार व्याप करतो. कोणी घट पूजन करतात, मदिरा आणतात, द्वैत भक्ती करतात, अशांवर दडपण टाकले तरी त्यांची मनभावना बदलत नाही. अशा मानवांना अमृत पाजण्याची काही आवश्यकता नाही. ज्याचे संचितात अमृत प्यावयाचे आहे, तोच या ठिकाणी येतो. ज्यांच्या संचितात नाही, तो येतो आणि जातो.
सद्गुरु ही परंपरा संगतीच आहे. पण बायका, मुले, संपत्ती ही कोणी संगती घेऊन गेला आहे का? सद्गुरु माऊली नेहमी संगती असतात. चारही देहात जा, कुठेही जा, पण ही शक्ती सेवेकऱ्याने मिळविली पाहिजे. जो सेवेकरी मायेत गुरफटला आहे, अशा सेवेकऱ्याला आसना जवळ येण्याची बुद्धी होऊ शकत नाही. अशा सेवेकर्यास सद्गुरु आसनाची सेवा वेळेवर मिळते हे म्हणने एका दृष्टीने सत्य आहे व एका दृष्टीने असत्य आहे.
ज्या सेवेकर्याला सद्गुरु तत्व कसे आहे, कोण आहे याची पूर्ण जाणीव मिळाली, ते तीनही अंगाने सेवा करतात. तो म्हणतो, माझे कुठे चुकत आहे, ते सद्गुरु माऊली पहात असते. सेवेकरी तीनही अंगाने कितपत सेवा करतात, सद्गुरु ते कधीही सेवेकर्याला दाखवत नाहीत, बोलत नाहीत. सर्वांगीण सेवा ज्याला कळली, कळून चुकली आहे, तो समजतो सेवा देणारा मी कोणीही नव्हे व घेणाराही मी कोणी नव्हे. मी सेवा देणारा कोण? आणि कोणाची सेवा कोणाला देत आहे? हे ज्याला समजले तो तिळमात्रही ढळणार नाही. (समाप्त) ©️