श्री संत ज्ञानेश्वर – जे दिसते, ते स्थूल दिसते. जड दिसते अन् जे सत् आहे, ते या जडाच्या आंत आहे. ज्यांच्या आधीन हे जडत्व आहे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे जडत्व फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणी जाळले, तर कोणी पुरले. तत्त्वात तत्व मिलन झाल्यानंतर नाश कशाचा होतो?
नासे याचा अर्थ काय? नासे म्हणजेच ना दिसे ! तुम्ही ज्या वेळेला जन्माला आलात, तत्पूर्वी तुम्ही कुठे होता? त्या वेळेला दृश्य होता की अदृश्य होता? एवढेच, लहान होता. लहानाचे मोठे झालात. मग नाश कोणाचा आहे? जे दिसत नाही, ते पण कधी कधी दिसते. इतकेच आहे, जे आहे ते दिसते कोणाला आणि नाही कोणाला? ज्याला दिसते त्यालाच दिसते ! ते पाहण्याची दृष्टी, सद्गुरूं शिवाय मिळत नाही. अन् दिसल्यानंतरच सेवेकरी त्यात तल्लीन होतो ना? जड हे फेकून दिल्यानंतर, समर्थ माऊली सूक्ष्माने कोठेतरी नेऊन ठेवतात. त्याला जर परत जन्माला पाठवायचे असेल तर तेच पाठवितात. पण मागच्या जन्माची आठवण त्याला नसते. जर सत मार्गी जाईल तरच सद्गुरु कृपेने त्याला मागील जन्माची आठवण मिळते. हे जे आहे त्याची मेख सद्गुरु कृपेनेच सापडते.
कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. नासते म्हणावे तर परत जन्माला कसे येते? हे करतो कोण? एकच सत् ! गुरुमाऊली !! ज्यांना कर्तव्य करून घ्यावयाचे असते, तेच उत्पत्ती स्थिती अन् लय करीत असतात. दुसरे कोणीही नाही.
बहुत जन्मांचे सुकृत, त्यांची भरपाई झाल्यानंतर ते आपल्या सानिध्यात घेतात. असे ते मालिक आहेत. सतपुरुषांना, योग्यांना हे जे आहे, ते सर्व अमरच आहेत असेच म्हटले पाहिजे.
वृद्धत्व आल्यानंतर, शरीर जीर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर जडत्वाला ताबडतोब उचलतात. कारण घाण लागेल म्हणून ! म्हणून हा सर्व दृश्य अदृश्याचा खेळ आहे. दुसरे काहीही नाही. दिव्यदृष्टीने पाहिल्यास कोणाचाही नाश होत नाही. अंगावरील वसन फाटल्यानंतर जसे आपण फेकून देतो, तत्वतच हे सारे आहे. यातच ओळखावे. जे दिसत नाही तेच सेवेकर्यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा. ते सद्गुरू शिवाय कोणीही दाखविणार नाही. तेच पांडुरंग ! तेच सर्वस्व !! अनंत रूपाने, अनंत नामाने ते नटलेले आहेत. म्हणून कोणत्या रूपाने त्यांना पहावे? हाक मारावी? ज्या नावाने हाक मारावयाची, ते नाम सेवेकऱ्यांना माहित आहे. (समाप्त) ©️
