सत मार्गाने जाणारा मानव हा पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जात असतो. नवमास भरल्यानंतर तो जन्माला येतो. त्यावेळी त्याला नाव गाव काही सांगितले नाही, कोणाचा आहे हे सांगितले नाही. १८ वर्षाचे वयात आल्यानंतर तो लगेच भक्तीला लागला आहे का? जर त्याची भावना शुद्ध सात्विक असेल, अन त्याच्या मनात जगात ईश्वर आहे ही भावना निर्माण झाली, मगच तो भक्तीने जाण्याचा प्रयत्न करतो.
सत् भक्तीचा प्रकाश म्हणजे पाचवा वेद आहे. पाचवा प्रणव आहे. असा तो ज्ञानमार्गाने जाऊ लागला तरी पूर्वजन्मीचे गाठोडे असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. प्रथम तो पोथ्यापुराणे वाचतो. काही पुस्तके वाचतो. तदनंतर त्याला भक्तीचे वळण लागते. नंतर तो गुरु करण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरुना शरण गेल्यानंतर त्याला ज्ञानाची म्हणजेच प्रकाशाची प्राप्ती होते. तो प्रकाशित होतो. त्या प्रकाशाच्या अनुसंधनाने वाटचाल करतो. नंतर त्याला स्वरूपी जाणीव मिळते. सूक्ष्माची गती मिळते. मग कारणाची आणि तदनंतर महाकारणाची गती मिळते. नंतर तो पात्र झाल्यावर अणू, रेणू, परमाणुची गती मिळते. पण कसे? तर तो आकाराच्या अनुसंधनानेच वाटचाल करतो व निराकार तत्वाची ओळख करून घेत असतो.
अशा रीतीने त्या ठिकाणी गेल्यानंतर, तो काय सांगणार आहे मी कुठे आहे? काय आहे? रूपात आहे की अरुपी आहे? काय सांगणार आहे तो? बोलता चालता सांगता येणार नाही. मात्र त्या पात्रतेची ज्योत असेल तर ! सत् हे आकारी आहे आणि निराकारी पण आहे. आकारात चुपचाप राहुल सर्वस्व कारभार करीत असतात. पण त्यांची ओळख अद्यापी कुणी करून घेतली नाही. निर्गुण जर नसेल तर सगुणाला काय किंमत आहे? म्हणून सगुणही मीच अन् निर्गुणही मीच !
संतांनी असे म्हटले आहे, पण केव्हा अन् कधी? हा प्रश्न आहे. ज्या वेळेला जडत्वाचा विसर पडेल, त्या वेळेला आकारी अन् निराकारी एकच असते ह्याची जाण होईल, पण जडत्वाचा पूर्णत्वाने विसर पडेल तेव्हा ! सद्गुरु चरणात पूर्णत्वाने लिन झाले मग मात्र सगुण, निर्गुण, मी, तू एकच आहे असे त्यावेळी म्हटले जाते. तोपर्यंत काही सांगता येत नाही. त्याला काही वर्षे लोटावी लागतील. मग मात्र भक्तीत मिलन झाला असे म्हणता येईल. ©️
