जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच उपासना करावयाची आहे. ही भूमी शापदग्ध असल्यामुळे, जरी सर्वस्वी आनंदात होते, तरी दुसऱ्याचे बंधनात असल्यामुळे तल्लीनता नाही. ही भूमी मुक्त झाल्यामुळे आता तल्लीनतेत आहेत. याला फारच महत्त्व आहे.
आपल्या सद्गुरूंना डोळे भरून पहाणे, त्यांचे रूप पाहणे. जशी प्रेरणा, धारणा, शक्ती त्याप्रमाणे मार्गस्थ होऊन त्यांना पाहणे, त्याच ठिकाणी तन्मय होणे यालाच परमानंद सच्चिदानंद म्हणतात.
या आनंदाच्या पायऱ्या आहेत. सेवेकरी अन सद्गुरु दोघेही तल्लीन होतात. गुरुपौर्णिमा कशासाठी तर तल्लीनतेसाठी आहे. आज त्याच्या खेरीज काही ध्यानात येणार नाही. या परमानंदात सर्व सेवेकरी तल्लीन आहेत. सर्व गुरुकुले मुक्त झालेली आहेत अन या स्थितीत त्यांना पाहण्याचे भाग्य लाभले आहे. सेवेकरी कसाही असो पण अंतःकरणातील सदभावनेने केलेली पूजा चरणांवर रुजू होते. सेवेकरी तन, मन, धन अर्पण करीत असतो. सर्व बहाल केलेले असते. तेव्हा सेवेकऱ्यांची पूजा चरणांवर रुजू करून घ्यावी लागते. कोणालाही अडथळा करता येत नाही. त्याच तऱ्हेने तो सेवेकरी दर्शन घेतो.
सगुणाने, सूक्ष्माने, तर कोणी तारकेत रममाण होतो. प्रकाशमान सेवेकऱ्यांनी आज पाहून घ्यावे. आज सर्वस्व बिंदूमय आहे, प्रकाशमय आहे. अन त्या प्रकाशातील तेजस्वी बिंदू तेच सद्गुरु आहेत. ते कसे आहेत ते प्रत्येक सेवेकऱ्याने ओळखले पाहिजे. रथी, महारथी, सद्गुरु कसे आहेत ते सांगतात, पण शुभ्र वलयात जी चांदणी चमचम करते तेच सद्गुरु आहेत हे सेवेकऱ्यांनी ओळखावे.
सेवेकऱ्यांच्या अंत:र्यामी सदभावना पाहिजे. नाम ही काठी आहे. सतभावना हा राजमार्ग आहे. नामरुपी काठीला धरल्यानंतर तो मार्ग आपोआप मिळतो.
सेवेकऱ्यांची अवहेलना झाली होती पण स्थूलातून दर्शन मिळत नव्हते. ते आज पूर्णत्वाने झाल्याने सेवेकरी तल्लीन झाले आहेत. सेवेकरी कुठेही असो, पण अंतर्यामी तळमळ असेल तर तो आपल्या सद्गुरूंना लोहचुंबकासारखा ओढून घेत असतो. सेवेकरी व सद्गुरु हे नाते अतूट व अजोड आहे. दूध अन पाणी वेगळे करता येईल पण सेवेकरी व सद्गुरु वेगळे करता येत नाहीत. गुरुकुले देखील आसुसलेली असतात. त्यानाही समाधान द्यायचे असते.©️
