श्री समर्थ मालिक – भक्ती ही साधी सोपी आहे हे सत्य आहे, पण तितकीच ती कठीणही आहे. या कठोरपणातून सेवेकरी निभावल्यानंतर त्याचा केसही वाकडा होणार नाही. सेवेकरी आणि आसनाधीस्त म्हणतात, मालकांनी डोळे झाकले आहेत, पण मालकांनी डोळे झाकलेले नाहीत. ते बरोबर घडवून घेतात. मग वक्रदृष्टीने पाहण्याचा योग येतो. त्यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही.
आदीअंतापासून सताला त्रासच आहे. कोणत्या भक्ताच्या बोलाप्रमाणे मानव चालला आहे का? पण त्या संतांनी कष्ट उचललेले कानावर आहेत ना? तितका त्रास हल्लीच्या सेवेकऱ्यांना नाही.
काळ जवळ आलेला आहे. त्याची चिंता नको. इतकेच, मानवी कर्तव्याचा तडाखा आणि निसर्गाचा तडाखा यात काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून सेवेकर्यांनी थोडा धीर धरणे. ठामपणा कशात ठेवावा? तर एकच, मी ज्यांना शरण आहे, मी त्यांच्या भक्तीत रममाण आहे, तेच माझे संरक्षक आहेत. तेच माझे संरक्षण करतील. देह जावो अथवा राहो हेच सेवेकर्यांनी ध्यानात ठेवणे. हे संदेश आहेत.
सद्गुरु दूर नाहीत. पण प्रकृतीच्या अंगाने पाहता म्हणून भीती वाटते. कर नाही त्याला डर कसली? सत कर्तव्य करताना सेवेकऱ्यांना भीती नाही. पण त्याने मनाने धीट राहावयास पाहिजे. पण अनुभव नसल्याने तो घाबरतो. जो सेवेकरी सताशिवाय कोणालाही भीत नाही. त्याचे कोणीही काहीही करू शकणार नाही. डर ही पाठीमागे ठेवल्याशिवाय कर्तव्याला चालना ही मिळत नसते. सेवेकऱ्याच्या अंगाला हात लावण्याची कोणाची टाप नाही. अंगाला हात लावू देणार नाही. हात लावला तर आकाश पाताळ एक केले जाईल. इतकेच काय, वक्रदृष्टी फिरली, मग काय होते ते पहा. अघोरांचा बिमोड झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला सत भक्तीचे बीज सापडले, त्याला चिकटून राहणे. मन चल बिचल होऊ देऊ नका. मायेने लाख खेळ केले, तरी त्या ठिकाणी लंपट होऊ नका. ज्याने प्रेमाच्या दोरीने मला हृदयात बांधून ठेवले, त्याच्याजवळ मी अखंड आहे. (समाप्त) ©️
