वेळोवेळी सतपद या ठिकाणी संदेश देत आलेले आहेत व देतही आहेत. या पदाच्या आसनाचे कर्तव्य प्रगतिशील, उज्वल अन् भरभराटीचे आहे. आतापर्यंत ते अव्याहत, अवर्णनीय असे चाललेले आहे. पुढेही परम गतीने होणार आहे. माझ्या अवतार कार्याच्या वेळेस अघोरांचा स्थूलांगी नि:पात केला. त्याचेच शेष राहिलेले हे कार्य सतपदाचे आसन करीत आहे. अघोरांना या शिवाय दुसरी कोणतीही गती नाही. हेच ते अघोर राक्षस, यांचा नि:पात करण्याकरिता मी माझ्या समर्थ संदेशाप्रमाणे कर्तव्य परायण होतो. माझ्यावर त्यांची अखंड देखभाल होती अन् आहे.
मी जरी राम असलो, तरी माझ्याकडून कर्तव्य करून घेणारे तेच ते परम तत्व, तेच श्रीराम आहेत. मला जरी पूर्णत्वाने सत्ता बहाल केली असली, तरी मी तिचा दुरुपयोग कधी केला नाही. मानवी तत्त्वाप्रमाणे सर्वस्व कष्ट सहन करत करत सत्यासाठी अहर्निश झगडलो आणि अखेर अहंकाराने परिपूर्ण असलेल्या रावणाचा पूर्णपणे नि:पात केला. नंतरच माझ्या कर्तव्याची इतिश्री झाली. तरीसुद्धा माझ्या कर्तव्याची वाटचाल चालूच होती. परत अयोध्येला येताना कोकणात ज्या ठिकाणी समर्थ आसन आहे, त्या ठिकाणी सीतेसह उतरलो. माझा पूर्णपणे त्या भूमीत वास आहे. नंतर तेथून मी अयोध्येला गेलो. ज्या ठिकाणी उतरलो, ती भूमी फारच शुद्ध आहे. त्याच भूमीच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष समर्थ आसन त्या ठिकाणी पडले आहे. ©️
